
अहिल्यानगर, दि. २१ मार्च –
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या घृणास्पद गुन्ह्यात, विशेष न्यायालयाने आरोपी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे (२०, खडांबे खुर्द, राहुरी, अहिल्यानगर) याला २० वर्षे सक्तमजुरीची कठोर शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय, विविध कलमांनुसार त्याला दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी दिली.
विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यात एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. ही धक्कादायक घटना १७ डिसेंबर २०२२ रोजी घडली, त्यावेळी पीडित मुलगी १२ वर्षे २ महिन्यांची होती.
आरोपी अजय उर्फ विनायक गर्जे याने त्याचा साथीदार गणेश राजेंद्र चव्हाण याच्या मदतीने पीडित मुलीला चेंडूफळ (ता. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) येथे फूस लावून पळवून नेले. तेथे अजय गर्जे याने तिच्यावर पाशवी अत्याचार केले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राहुरी पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आणि आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, “पीडित मुलगी घटनेच्या वेळी १२ वर्षे २ महिन्यांची होती. तिच्या बालमनावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला आहे. या घटनेचे ओरखडे तिच्या मनावर आयुष्यभर राहतील. आरोपीला निर्दोष सोडल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल आणि अशा घृणास्पद घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणे आवश्यक आहे,” असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
खटल्यात सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांना पैरवी अधिकारी योगेश वाघ आणि इफ्तेकार सय्यद यांनी महत्त्वपूर्ण सहाय्य केले.


