
मुंबई, दि. २० मार्च २०२५:
परभणीतील आंबेडकरी चळवळीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप असतानाही, पोलिसांनी ‘आकस्मिक मृत्यू’ असा अहवाल देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातही मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
“पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, हे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तरीही फडणवीस सरकार दोषी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करत नाही, हे दुर्दैवी आहे. परभणीतील घटना अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. अनेकांना जबर मारहाण झाली आणि तुरुंगात टाकण्यात आले. सोमनाथ सूर्यवंशी यांनाही मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला,” असे सपकाळ म्हणाले.

“परभणीत कोंबिंग ऑपरेशन आणि लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? मंत्रालयातून की पोलीस महासंचालक कार्यालयातून? याची चौकशी झाली पाहिजे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस परभणीचे प्रकरण हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. एका दलित तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू होतो, पण सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. यावरून भाजप-युती सरकार दलितविरोधी असल्याचे स्पष्ट होते,” असा आरोप सपकाळ यांनी केला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून परभणीला भेट देऊन सूर्यवंशी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस पक्ष सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करेल, असेही सपकाळ यांनी सांगितले.



