
मुंबई, दि. २२ मार्च – प्रतिनिधी
संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांवर नगरपरिषदेने अन्यायकारक शास्तीकर आणि दंडाचा बोजा टाकला आहे. यातून दिलासा मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असून, त्यांनी लवकरच बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली.
आपल्या फेसबुक या समाज माध्यमात दिलेल्या माहितीमध्ये खताळ म्हणाले, संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून छोट्या-मोठ्या जागा घेतल्या आणि हक्काची घरे उभारली. मात्र, नगरपरिषदेने त्यांना अनधिकृत बांधकामांचे कारण सांगत शास्तीकर आणि २% व्याजासह मोठी रक्कम भरण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना ही रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून संगमनेर नगरपरिषदेच्या हद्दीतील मालमत्ताधारकांना आकारण्यात येणारा शास्तीकर आणि दंड माफ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील नागरिक शास्तीकरासंबंधी प्रश्न उपस्थित करत होते आणि निवेदने देत होते. ही गंभीर समस्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली असून, त्यांनी लवकरच यावर बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या आश्वासनामुळे संगमनेरकरांना शास्तीकरातून दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


