शिर्डी, दि. २२ मार्च –
संत साहित्य आणि विचारांमधून समाजात एकतेचा संदेश दिला जातो. संतांची भूमिका नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी असते. संत साहित्य जोपर्यंत जिवंत राहील, तोपर्यंत समाजातील विषमता नष्ट होईल आणि एकता निर्माण होईल. संत विचारांमध्ये समाजाला एकत्र ठेवण्याची ताकद आहे, असे राज्याचे जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला शिर्डी येथे सुरुवात झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, मागील संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ह.भ.प चकोर महाराज बावीस्कर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री विखे म्हणाले, श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत संत साहित्य संमेलनाचे आयोजन करणे ही जिल्हा वासियांसाठी भाग्याची गोष्ट आहे. संत साहित्यातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येतो. संतांची भूमिका नेहमीच लोककल्याणाची असते. मराठी भाषा आणि तिच्या बोलीभाषांमध्ये संत साहित्याचे प्रतिबिंब दिसते. संत साहित्य समाजाच्या उन्नतीसाठी आहे.
संत साहित्य जिवंत राहिले, तर समाजातील विषमता नष्ट होऊन एकता निर्माण होईल. संत साहित्यात समाजाला एकत्र ठेवण्याची ताकद असल्याने प्रत्येकाने संत साहित्य वाचले पाहिजे. या साहित्यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया भक्कम करण्याचे काम झाले आहे. संतांनी आपल्याला समाज सुधारणेचा मंत्र दिला आहे. संत साहित्याच्या माध्यमातून निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम झाले आहे. ही परंपरा पुढे नेत असताना लोकशिक्षण आणि लोकजागृतीचे काम संत आणि वारकरी निश्चितपणे करतील, अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली.
रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संतांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करतात. वारकरी माणसांचे कल्याण करतात आणि सुखदुःखात जगण्याचा मंत्र देतात. संत आणि वारकरी नसते, तर समाज व्यवस्था टिकली नसती. माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे आणि समाज एकत्र ठेवण्याचे काम संत आणि वारकऱ्यांनी केले आहे. वारकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. समाजातील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी संत आणि वारकऱ्यांनी समाजप्रबोधन आणि संस्काराचे काम प्रभावीपणे करावे.

संजय शिरसाठ म्हणाले, संत आणि वारकरी संस्कृती टिकवण्याचे काम करतात. वारकऱ्यांच्या माध्यमातून आध्यात्मिक वारसा सामान्य लोकांपर्यंत पोहोचतो, आणि समाजातील सांस्कृतिक मूल्यांचे जतन होते. राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या समन्वयाने समाजात चांगले बदल घडवून आणण्याचे काम झाले पाहिजे.
वारकरी साहित्य संमेलनाला सामाजिक न्याय विभागाने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. सर्व वारकरी दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांची शासनाकडून मदत दिली जाईल. संत साहित्य आणि वारकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य शासनातर्फे केले जाईल.
संमेलनाध्यक्ष देहूकर महाराज म्हणाले, संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय हे मराठी संस्कृती आणि भक्ती परंपरेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. वारकरी संप्रदाय भगवान विठ्ठलाच्या भक्तीवर आधारित आहे, आणि संतांनी रचलेले साहित्य भक्ती, ज्ञान आणि समाज प्रबोधनाचे माध्यम बनले आहे.
यावेळी ह.भ.प माधव महाराज शिवणीकर आणि सदानंद मोरे यांची भाषणे झाली. प्रास्ताविकात विठ्ठल पाटील यांनी वारकरी संत साहित्य संमेलन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी, साईबाबा समाधी मंदिर ते संमेलनस्थळ शेती महामंडळ मैदानापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीची सांगता अश्व रिंगणाने करण्यात आली. दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचा समारोप २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनाला राज्यातून मोठ्या संख्येने वारकरी आणि संत अभ्यासक उपस्थित झाले आहेत.


