
अकोले (अहिल्यानगर) दि. २३ मार्च –
महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, महायुती पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम २१०० रुपये करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सरकार स्थापन होऊन १०० दिवस उलटले तरी महिलांना या वाढीव रकमेची प्रतीक्षा आहे. या योजनेबाबत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असून, यावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ती सुरूच राहणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. २१०० रुपये देण्याबाबत सरकार योग्य वेळी निर्णय घेईल. १५०० रुपये देण्याचे वचन आम्ही पूर्ण केले आहे, त्याचप्रमाणे २१०० रुपये देण्याचे वचनही पूर्ण करू.” असं सांगताना २१०० रुपये कधीपासून देणार हे मात्र त्यांनी सांगितले नाही.
विरोधकांवर टीका… “लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे ते नैराश्यातून टीका करत आहेत. मात्र, आम्ही महिलांना २१०० रुपये देण्याचे वचन दिले आहे आणि ते पूर्ण करणार आहोत,” असे मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.

मंत्री अदिती तटकरे यांनी अकोले येथील कळसूआई महोत्सवाला भेट दिली आणि महिलांनी स्वयंसिद्ध केलेल्या स्टॉल्सला भेट देऊन खरेदीचा आनंद घेतला. ग्रामीण भागातील बचत गटांतील महिलांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी पतसंस्था स्थापन करून बँकिंग क्षेत्रात यावे, असे आवाहन त्यांनी केले.


