
संगमनेर दि. २४ मार्च – प्रतिनिधी
संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता आणि पाणीपट्टी थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. शहरातील पाच मालमत्ताधारकांची एकूण ९ लाख ८ हजार ९७१ रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत नऊ नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. अशी माहिती संगमनेर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी व गाळे भाडे कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
या मोहिमे अंतर्गत उप मुख्याधिकारी संजय पेखळे, प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, कर निरीक्षक दत्तू साळवे, सहाय्यक कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ यांच्यासह नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेले ६ वसुली पथके नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाद्वारे मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांवर मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन बंद करणे यांसारख्या विविध कारवाई करण्यात येत आहे.

विशेष वसुली मोहिमे अंतर्गत नियुक्त केलेल्या पथकाद्वारे शहरातील विविध भागातील कारवाईमध्ये संजय पेखळे, प्रल्हाद देवरे, बाजीराव नवले, प्रणोती पवार, तुकाराम कानसकर, प्रदिप मावलकर, साजिद पटेल, वैष्णवी गडाख, ओंकार सहाणे, सुनील हामंद, जालिंदर हिरे, वसंत मेहेर, भीमाशंकर वर्पे, रमेश ताजणे, कुणाल चांगरे, मच्छिद्र काठे, अल्ताफ शेख, विजय अभंग आदी सहभागी होते.
मार्च महिना असल्याने मालमत्ता व पाणीपट्टी कराची वसुली अंतिम टप्प्यात असून जे थकबाकीदार कर भरणार नाही, अशा थकबाकीदारांची नावे लवकरच वृत्तपत्रात प्रसिद्ध करणार आहे. तसेच अशा थकबाकीदारांची नावे चौका-चौकात फ्लेक्स बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार असून अशा थकबाकीदारांवर कारवाईचे स्वरूप तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदार यांनी आपल्या कराचा नगरपरिषदेत वेळेत भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी कोकरे यांनी केले आहे.


