
संगमनेर, दि. २७ मार्च – प्रतिनिधी
मार्च अखेर ऊन चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यासह इतर भागातून संगमनेर मध्ये येणाऱ्या नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले पिण्याच्या शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभारी शहराध्यक्ष रवींद्र कानकाटे यांनी केली आहे.
संगमनेर नगर परिषदेने एका खाजगी एजन्सी मार्फत शहरात बहुतांश ठिकाणी शुद्ध आणि थंड पाण्याचे एटीएम बसविले आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे एटीएम बंद आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध होत नाही. आता उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना अल्प दरात शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हे एटीएम संगमनेर नगर परिषदेने संबंधित ठेकेदारामार्फत पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.
तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या पाण्याच्या एटीएम मधून नागरिकांना एक रुपयात एक लिटर थंड आणि शुद्ध पाणी मिळत होते. शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम अतिशय उपयोगी असा ठरला होता. याशिवाय या एटीएम मधून बहुतेक व्यावसायिक देखील पाण्याचे जार भरून नेत असत. त्यामुळे हॉटेलमधील अस्वच्छ टाक्यांमधील पाणी पिण्याऐवजी नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत असे.

शहराच्या विविध भागात फिल्टर पाण्याचे हे एटीएम मशीन बसविण्यात आले होते. मात्र सध्या ते बंद अवस्थेत आहे. उपनगरातील मुख्य सेंटरमधून शुद्ध केलेले पाणी या एटीएममध्ये टाकले जात होते. केवळ नागरिकांनाच नव्हे तर व्यावसायिकांना देखील या एटीएम मशीनचा फायदा होत होता.
आता उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नगरपरिषदेने पाण्याचे हे एटीएम मशीन पुन्हा सुरू केल्यास नागरिकांना थंड आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे नगर परिषदेने यात लक्ष घालून हे एटीएम सुरू करावे अन्यथा यासाठी शिवसेनेला आंदोलन करण्याची वेळ आणू नये असे देखील कानकाटे यांनी म्हटले आहे.


