
संगमनेर, दि. २८ मार्च – प्रतिनिधी
संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित मोक्का खटल्याचा गुरुवारी (२७ मार्च) निकाल लागला. या खटल्यातील सर्व चारही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी संतोष शिवाजी जाधव, चंदर दादाभाऊ गाडे, संजय दत्तू धांडे आणि शरद बन्सी निचित यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या आधारे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१),(२), ३(४) प्रमाणे या आरोपींविरोधात कारवाई केली होती.
याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, तत्कालीन निरीक्षक निघोट यांनी या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध २०१७ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. या मोक्का केसाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर झाली. या बहुचर्चित खटल्याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले होते.

संगमनेर न्यायालयात मोक्का अंतर्गत दाखल झालेला हा पहिला एकमेव खटला होता. सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. बी. जी. कोल्हे यांनी तर आरोपींच्यावतीने ॲड. अतुल आंधळे व ॲड. सीमा काळे-सातपुते यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. मोहन फटांगरे, ॲड. ऋषिकेश होले, ॲड. अमृता गुंजाळ आणि ॲड. प्रमोद शिंदे यांनी सहकार्य केले.
मोक्कासारख्या या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकूण १५ ते २० साक्षीदार तपासण्यात आले. मात्र सरकार पक्षाला आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात यश आले नाही. उलट आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीशांनी या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.


