
अहिल्यानगर, दि. २८ मार्च –
राहुरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सभोवती असलेल्या अतिक्रमणाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
राहुरी येथे दोन दिवसांपूर्वीच्या घटनेनंतर मंत्री विखे यांनी राहुरी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डीले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

मंत्री विखे पाटील म्हणाले, राहुरी येथील घटनेचा तपास पोलीस योग्य दिशेने करीत आहेत. त्यांना थोडा कालावधी अजून द्यावा लागेल. घडलेली घटना अतिशय निंदनीय असून त्याचा आपणही तीव्र शब्दांत निषेध करतो. अशा घटना घडविणारे कोण आहेत याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहेत. तपासातील नेमकी माहिती त्यांच्यापर्यंत आली असली तरी त्यांना अधिक वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. सामाजिक एकोपा कायम राखून या शहराचा नावलौकिक उंचावण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
घटनेनंतर आपण जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात राहून सातत्याने माहिती घेत होतो. प्रशासनाने योग्य भूमिका घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दोन दिवस राहुरी तालुक्यातील जनता, कार्यकर्ते यांनी दाखवलेला संयम खूप महत्त्वपूर्ण असल्याचा उल्लेख करून शिवाजीराव कर्डिले यांनी दोन दिवसांत चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, असेही पालकमंत्री म्हणाले.


