अहिल्यानगर, दि. ३१ मार्च –
‘लाडकी बहीण योजने’च्या पात्रतेचे निकष डावलून लाभ घेणाऱ्या महिलांवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल १५०० हून अधिक महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची नावे महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आली असून, त्यांचा ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या या कठोर भूमिकेमुळे ‘लाडकी बहीण योजने’तील अपात्र लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १२ लाखांहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
मात्र, निवडणुकीनंतर या योजनेच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. अनेक अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने आता अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
यासाठी सरकारने सुरू केलेल्या पडताळणीत धक्कादायक माहिती उघड उघड झाली आहे. राज्य सरकारने परिवहन विभागाकडे नोंदणी असलेल्या महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवली आहे. या यादीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात १५०० हून अधिक महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या महिलांनी योजनेच्या पात्रतेचे निकष डावलून लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई अटळ… आता राज्य सरकार या अपात्र लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळण्याची शक्यता आहे. या महिलांना आतापर्यंत मिळालेली आर्थिक मदतही परत घेतली जाण्याची शक्यता असून या अपात्र लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे ‘लाडकी बहीण योजने’चे निकष..
* लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.
* लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
* लाभार्थी महिलेच्या नावावर चारचाकी वाहन नसावे.
* लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसावा.



