
महाराष्ट्र संवाद न्यूज
मंगळवार, दि. १ एप्रिल
येवला तालुक्यातील सावखेडा येथे दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ३१ मार्च रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास सावखेडा येथील समाधान गोरे यांच्या शेततळ्यात शुभम शांताराम गोरे आणि साई संदीप कुमावत (वय १२) ही दोन मुले अंघोळीसाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येवला तालुका पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृत मुलांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, मतदारसंघात पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी शेततळ्यांना संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, वसंत पवार, दीपक लोणारी, दत्ता निकम, मकरंद सोनवणे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या घटनेमुळे संपूर्ण सावखेडा गावावर शोककळा पसरली आहे. दोन्ही मुलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


