संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी
राजहंस दूध संघाच्या ‘मिशन ५० लिटर’ उपक्रमाअंतर्गत कालवड संगोपन कार्यशाळेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी दूध संघाची स्थापना केली, आज तालुक्यात ९ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन होण्यासाठी राजहंस दूध संघाचा ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाई निर्माण करण्याचा उपक्रम दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

यावेळी ५० लिटर दूध निर्मिती करणाऱ्या नवीन कालवडी आणि गाईंचे प्रदर्शन झाले. मिशन ५० लिटर अंतर्गत कालवड संगोपन योजना कार्यशाळेत थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, डॉ.अण्णासाहेब शिंदे, मनीभाई देसाई, आप्पासाहेब पवार यांच्यासह जुन्या पिढीने दूध वाढीबाबत मेळावे घेऊन दिशा दाखविली. १९८० नंतर तालुक्यात दूध वाढीसाठी प्रयत्न केले गेले. मुरघास, एमडीफ गोठा योजना यशस्वी ठरल्या. गुणवत्ता आणि शुद्ध दूध हे वैशिष्ट्य जपले पाहिजे. ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाई निर्माण करण्याचा उपक्रम महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल.
१ एप्रिलपासून प्रति लिटर ३४ रुपये भाव देण्यात येणार असल्याचे रणजितसिंह देशमुख यांनी जाहीर करत देशमुख म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची वाटचाल सुरू आहे. एमडीएफ गोठा आणि मुरघास पद्धत आता राज्यात पोहोचली आहे. दुधाला यापुढे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे. ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाईंसाठी १२५० गाईंची नोंदणी केली आहे. कालवडींचे संगोपन महत्त्वाचे आहे. त्यांना योग्य आहार देणे आवश्यक आहे. गाईंचे आरोग्य आणि स्वच्छता जपली तर दूध व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल.
कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अब्दुल समद, उदय तिवारी, डॉ. परीक्षित देशमुख, विक्रम भंडारी, विजय विश्वकर्मा यांनी मार्गदर्शन केले. स्वागत डॉ. प्रमोद पावसे यांनी केले. तर प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले. ॲड. जोंधळे यांनी सूत्रसंचालन केले तर विलास कवडे यांनी आभार मानले. दूध उत्पादक शेतकरी आणि विविध दूध सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


