
संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी
काल (बुधवारी २ एप्रिल) संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कौठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाई वीज पडून मृत पावल्या. या घटनेमुळे घुले कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी आज तातडीने घुले कुटुंबीयांची भेट घेऊन याबद्दल दुःख व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले, प्राजक्ता घुले आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. जयश्री थोरात यांनी दु:ख व्यक्त करत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.
डॉ. थोरात म्हणाल्या, “शेतकरी खूप कष्टाने पिके घेतात. संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. दुधाचा तालुका म्हणून आपली ओळख आहे. कालच्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. घुले कुटुंबाच्या गाई मृत पावल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने मदत द्यावी.”

पांडुरंग घुले म्हणाले, “बाळासाहेब थोरात महसूल आणि कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना खूप मदत मिळत होती. त्यांनी कधीही राजकारण न करता सर्वांना सोबत घेतले. कालच्या अवकाळी पावसानंतर त्यांनी तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली.”
यावेळी डॉ. जयश्री थोरात यांनी घुले कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून अवकाळी पावसामुळे गाईंच्या झालेल्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आणि परिसरातील नुकसानीची पाहणी केली.


