
राहाता, दि. ३ एप्रिल –
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने खाजगी संस्थांनाही सदस्यत्व देण्यास सुरुवात केल्यामुळे, ही संस्था आता राजकीय अड्डा बनत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. या संस्थेने सहकारी संस्थांना बळकट करण्याचे धोरण अवलंबायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. राज्यातील सहकारी चळवळीसमोर अनेक प्रश्न आहेत, परंतु ते सोडवण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांचे नाव न घेता, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली की, ‘जाणते राजे’ देखील दिल्लीत केवळ शिष्टमंडळ घेऊन जातात. सहकारी संस्थांचे प्रश्न न सुटल्यामुळे अनेक संस्था बंद पडल्या आहेत. कारखान्यांचे खाजगीकरण झाले आणि ते कवडीमोल भावाने विकले गेले. सहकारी संस्थांना दडपून टाकून दहशत निर्माण करण्यात आली आणि राजकीय फायद्यासाठी संस्थांचा वापर केला गेला, असा आरोपही त्यांनी केला.

पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा अमृतमहोत्सवी गळीत हंगाम समारोप माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी मंत्री विखे बोलत होते. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब भोसले, अध्यक्ष कैलास तांबे, उपाध्यक्ष सतीश ससाणे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे आदी उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे आधुनिकीकरण आणि गाळप क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून, सभासदांना योग्य भाव देण्यात कारखाना प्रथम क्रमांकावर राहील, असे आश्वासन विखे यांनी दिले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे होत असताना कारखान्याने ७५ वर्षांचा प्रवास पूर्ण करणे ही सहकारी चळवळीसाठी अभिमानाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
शेतकरी आणि सभासदांच्या हिताच्या निर्णयामुळेच हा कारखाना ७५ वर्षे अखंडपणे सुरू राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर सहकारी चळवळीला मोठी ताकद मिळाली आहे. अहिल्यानगर जिल्हा बँकेने चांगले काम केल्यामुळे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने टिकून राहिले आहेत. योग्य नियोजनामुळे पाण्याची समस्या उद्भवणार नाही. पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन झाल्यामुळेच बंधारे आज भरलेले आहेत. येत्या ७ तारखेपासून भंडारदरा धरणातून पाणी सोडले जाईल आणि आणखी दोन वेळा पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.


