महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर:
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विभागांनी आवश्यक ती पूर्वतयारी वेळेत पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवावी. टंचाई निवारण, पूर प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि रस्ते दुरुस्ती यांसारख्या कामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्व यंत्रणांनी अधिक संवेदनशील होऊन आणि परस्परांमध्ये समन्वय राखून काम करावे, अशा कडक सूचना महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई व मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे आणि निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह आमदार काशिनाथ दाते, आमदार हेमंत ओगले, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर भाष्य करताना पालकमंत्री म्हणाले की, ज्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तिथे पारदर्शकता राखणे अत्यंत आवश्यक आहे. लोकसंख्येचा विचार करून गावांमध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यात याव्यात आणि त्याद्वारेच पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळता येईल. विशेष म्हणजे, टँकरग्रस्त भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी फिरते जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यावर त्यांनी भर दिला. या टाक्यांची नियमित स्वच्छता करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे गावनिहाय वेळापत्रक निश्चित असावे आणि पाणी वाटपाच्या वेळी तलाठी तसेच ग्रामसेवकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात यावी. जर पाणी वाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आढळला, तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यातील संभाव्य साथीच्या आजारांबाबत सतर्कता म्हणून आरोग्य विभागाने दर आठवड्याला गावागावांतील पाण्याचे नमुने तपासावेत आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. नादुरुस्त असलेले जलशुद्धीकरण प्रकल्प तातडीने युद्धपातळीवर दुरुस्त करून ते कार्यान्वित करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने २४ तास सतर्क राहून नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
बैठकीच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील टंचाई निवारण उपाययोजना आणि मान्सूनपूर्व तयारीची सविस्तर आकडेवारी सादरीकरणाद्वारे मांडली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.






