
नांदेड, दि. ४ एप्रिल –
नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी (दि. ४) पहाटे भीषण अपघात झाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज गावातील महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या दुर्घटनेत आठ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतांमध्ये चित्राबाई माधव पारदे, सिमरन संतोष कांबळे, सपना राजू राऊत (२५), ज्योती इरबाजी सरोदे (३५), सरस्वती लखन बुरड (२५), ताराबाई सटवा जाधव (४०), धुरपता सटवा जाधव (१८) यांचा समावेश आहे. पार्वतीबाई बुरड (३५), पुरभाबाई कांबळे (४०) आणि सटवाजी जाधव (५५) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

गुंज येथील १० महिला व एक पुरुष आलेगाव शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरने निघाले होते. आलेगाव शिवारात दोन शेतांमध्ये असलेल्या चारीमधून ट्रॅक्टर घेताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. यात आठ महिलांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लिंबगाव पोलीस आणि नांदेड आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनीही तातडीने महसूल अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे आणि गुंजचे पोलीस पाटील अंकुश सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्यात सहभाग घेतला. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. ट्रॅक्टर कोण चालवत होते, याचा तपास पोलीस करत आहेत.


