संगमनेर, दि. ४ एप्रिल –
राज्याच्या आजी-माजी महसूलमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या साखर कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. कारखान्यावरील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासाठी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आतापर्यंतच्या दोन दिवसात केवळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज साकुर, जोर्वे आणि सोसायटी मतदारसंघातून दाखल झाला आहे.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली जोरात कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने विखे समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. मात्र आतापर्यंत विरोधी गटाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज मिळणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीच्या मैदानात कोण लढते याची देखील उत्सुकता आहे. सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या स्थापनेपासून या कारखान्यावर थोरात परिवाराचे वर्चस्व राहिले आहे.

दुसरीकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखालील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील पुढील महिन्यात होत असून या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय राहते याकडे लक्ष लागले आहे. थोरात यांनी काही दिवसांपूर्वी गणेश सहकारी साखर कारखान्यात विवेक कोल्हे यांना सोबत घेत गणेश कारखान्यावरील विखेंची सत्ता संपुष्टात आणली होती. त्यामुळे याची देखील भीती मंत्री विखे यांना आहे.
अशा स्थितीत दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका कशा पद्धतीने होतात याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.


