
संगमनेर, दि. ५ एप्रिल – प्रतिनिधी
छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहागड किल्ल्याचे तसेच पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या पेमगिरी येथील विशाल वटवृक्षाच्या परिसराचा विकास करण्यासाठी मोठा निधी आणला जाईल, अशी ठोस ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील शहागडच्या विकासाचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी नुकताच विधिमंडळात मांडून शासनाचे लक्ष वेधले. या प्रयत्नांबद्दल पेमगिरी ग्रामस्थांच्या वतीने आमदार खताळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात ते बोलत होते.

आमदार खताळ यांनी सांगितले की, शहागड तसेच महाकाय वटवृक्षाचा समावेश पर्यटन विकास आराखड्यात करण्यासाठी आपण पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून या परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच, पेमगिरी आणि परिसरातील वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मोरदरावाडी पाझर तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांशी समन्वय साधून योग्य तोडगा काढला जाईल. तसेच, या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरदरावाडी पाझर तलावाच्या दुरुस्ती व पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन खताळ यांनी दिले.

या कार्यक्रमात जवाहरलाल नेहरू विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पावसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. ज्ञानदेव सहाणे यांनी केले. याप्रसंगी महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पेमगिरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

