संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी
संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय विरोधी गटातील प्रमुख नेत्यांनी सर्वानुमते घेतला आहे. आमदार अमोल खताळ, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, वसंतराव गुंजाळ आणि संतोष रोहोम यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निर्णयाची माहिती दिली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर विरोधी महायुतीकडून या संदर्भात माध्यमांना आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून तातडीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
प्रसिद्धी पत्रकात कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्सची रक्कम भरून न घेणे, अनेक मृत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले तालुक्यातील सुमारे दोन हजार सभासदांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नाकारणे यांसारख्या गंभीर तक्रारींमुळे सहकार चळवळीतील मूल्यांची पायमल्ली होत असल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता आणि त्यासाठी प्राथमिक तयारी देखील सुरू होती. मात्र, मतदार यादीतील गंभीर त्रुटी आणि सहकारी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला.
विरोधी नेत्यांनी सांगितले की, कारखान्यातील सुमारे दोन हजार सभासद मृत आहेत आणि त्यांच्या वारसांची कोणतीही नोंदणी प्रशासनाने केलेली नाही. विशेष म्हणजे, या मृत सभासदांमध्ये त्यांच्या समर्थकांचा मोठा समावेश आहे. “सहकार चळवळीत राजकारण नको” ही त्यांची भूमिका असूनही, विद्यमान प्रशासनाने मतदार यादीबाबत सभासदांच्या मागणीचा विचार न करणे हे सहकार चळवळीच्या मूळ तत्वांच्या विरोधात आहे, असे त्यांनी नमूद करत सभासद मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. तसेच, सभासद असलेल्या कार्यकर्त्यांना कोणताही वैयक्तिक त्रास होऊ नये आणि त्यांचे आर्थिक नुकसान टाळले जावे, ही प्रमुख भूमिका आहे.
निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चांगली संख्या उपलब्ध असताना, उमेदवारांची नावे समोर येऊ लागताच दबावतंत्राचा वापर आणि प्रलोभने दाखवण्याचे प्रकार सुरू झाले, जे सहकार चळवळीला बदनाम करणारे असून केवळ निवडणुकीसाठी निवडणूक करणे योग्य नाही, असे नमूद करत, विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने विकासासाठी दिलेल्या कौलाचा आदर करून आपले कार्य सुरू ठेवले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून, तालुक्याच्या विकासासाठी ते कटिबद्ध राहतील, असे पत्रकात शेवटी स्पष्ट करण्यात आले आहे.


