शिर्डी –
शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारात काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडात गंभीर जखमी झालेल्या साखरबाई साहेबराव भोसले (वय अंदाजे ६०) यांचा रविवारी (दि. १३ एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा बळी गेला आहे.

या दुर्दैवी घटनेत ५ एप्रिल रोजी चोरट्यांनी साहेबराव पोपट भोसले (वय अंदाजे ६५) आणि त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय अंदाजे ३०) यांची हत्या केली होती. त्यावेळी साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या मारेकऱ्यांनी केलेल्या या क्रूर कृत्यामुळे भोसले कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. वडील आणि मुलाचा दशक्रिया विधी होण्यापूर्वीच आईचाही मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेतील आरोपी संदीप दहाबाड (वय १८) आणि जगन काशिनाथ किरकिरे (वय २५) हे दोघे तरुण भोसले यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या शेतात जनावरांसाठी मुरघास बनवण्यासाठी आणले होते. भोसले यांचा दुग्ध व्यवसाय असल्याने या दोघांनी त्यांना मुरघास बनवून दिला होता. याच ओळखीचा गैरफायदा घेत या दोघांनी घरात चोरी करण्याचा कट रचला.

मुरघासचे काम संपल्यानंतर ५ एप्रिलच्या रात्री दबा धरून बसलेल्या या दोघांनी पहाटे भोसले यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. ओळखीच्या आवाजामुळे दरवाजा उघडताच त्यांनी धारदार हत्यार आणि फावड्याने हल्ला केला. यात कृष्णा आणि साहेबराव यांचा जागीच मृत्यू झाला, तर साखरबाई गंभीर जखमी झाल्या. आरोपींनी घरातून मोबाईल आणि सोन्याचे दागिने चोरून मोटारसायकलवरून पलायन केले होते.
पोलिसांनी तातडीने तपास करत बारा तासांच्या आत दोन्ही आरोपींना सिन्नरमधील पळसे टोलनाक्याजवळ अटक केली. त्यांनी चोरीच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. एकाच कुटुंबातील तिघांच्या निर्घृण हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
या गुन्ह्यातील तपासी अधिकारी तथा शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरिष वमने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी आहे. तसेच, इतर तपास सुरू असल्याने आरोपींकडून जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची खातरजमा आणि मोजदाद अद्याप केलेली नाही. पोलिसांनी नऊ दिवस उलटूनही जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील जाहीर न केल्याने नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.


