
महाराष्ट्र संवाद न्यूज – राहाता
राहाता तालुक्यातील गणेशनगर येथून एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करून, लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करत त्याचा खून करण्यात आला. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात स्कोडा गाडीच्या डिकीत टाकून दिला. या घृणास्पद कृत्याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत युवकाचे नाव प्रतीक वसंत सदाफळ (वय १९) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १२) रात्री सुमारे ११ वाजता गणेशनगर येथील निर्मळ रुग्णालयासमोरून त्याचे अपहरण झाले. संशयितांनी त्याला सिल्व्हर रंगाच्या स्कोडा गाडीच्या डिकीत टाकले आणि अज्ञात स्थळी नेऊन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी मृतदेह सिन्नर-शिर्डी महामार्गालगत मुसळगाव शिवारात वनीकरण विभागाच्या नालीच्या पायथ्याशी फेकून दिला.

मृतक प्रतीकचे काही दिवसांपूर्वी संशयित प्रशांत जनार्दन जाधव, अक्षय पगारे, चंदू तहकीक, ओमकार शैलेष रोहम, प्रवीण वाघमारे आणि सोनू पवार यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याच वादातून तरुणांनी प्रतीकचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा संशय आहे. प्रतीक बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईने यापूर्वी वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
दरम्यान, १३ एप्रिलच्या रात्री १२.१५ वाजता मयत प्रतीकचा भाऊ रितेश सदाफळ याला संशयित प्रशांत उर्फ बाबू जनार्दन जाधव याने त्याच्या भावाच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल केला. कॉलमध्ये त्याचा भाऊ मृतावस्थेत आणि विवस्त्र अवस्थेत दिसत होता, अशी फिर्याद रितेश सदाफळ याने सिन्नर एमआयडीसी पोलिसांकडे नोंदवली.
या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित प्रशांत उर्फ बाबू जनार्दन जाधव (रा. शिर्डी), अक्षय पगारे (रा. शिर्डी), चंदू तहकीत (रा. सावळी विहीर, राहाता), ओमकार शैलेश रोहम (रा. राहाता), प्रवीण वाघमारे (रा. कालिकानगर, शिर्डी) आणि सोनू पवार (रा. सावळी विहीर, राहाता) या सहा जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२ (खून) आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर सर्व संशयित फरार असून, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील आणि त्यांचे पथक त्यांचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे राहाता आणि शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात अवैध धंदे, हाणामारी, शिवीगाळ आणि अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

