
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या अवैध धंद्यांविरोधात जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
शनिवारी (१९एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, “अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोरपणे कारवाई व्हावी. अवैध शस्त्रे आणि गुटखा विक्रीलाही पूर्णपणे आळा घालण्यासाठी मोहीम स्तरावर कारवाई करा. काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई करा. लहान अक्षरातील नंबर प्लेट लावलेल्या वाहनांवरदेखील दंडात्मक कारवाई करा. जिल्ह्यात कोणताही अवैध व्यवसाय सुरू राहणार नाही याची दक्षता घ्या. शासनाचे पोलीस दलाला या कारवाईत पूर्णपणे सहकार्य राहील.”
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण राखण्यासाठी अशी कारवाई गरजेची असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



