संगमनेर – प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने वीज निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. विशेष म्हणजे, या पुरस्काराने कारखान्याचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव करण्यात आला आहे, जो कारखान्याच्या उत्कृष्ट कार्याचा हा पुरस्कार गौरव ठरला आहे.

पुणे येथील बाणेरमध्ये नॅशनल को-जनरेशन फेडरेशनच्या वतीने आयोजित शानदार सोहळ्यात ज्येष्ठ राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांनी स्वीकारला. या प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. एन. पाटील, प्रतापराव पवार, राजेंद्र नागवडे, विवेक कोल्हे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, चीफ इंजिनियर नवनाथ गडाख, चीफ केमिस्ट संजय पाटील, अशोक मुटकुळे, भारत देशमुख, भाऊसाहेब खर्डे यांच्यासह विविध पदाधिकारी या गौरव सोहळ्याला उपस्थित होते.
थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली साकारलेला ५५०० मे. टन क्षमतेचा नवीन प्रकल्प आणि ३० मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प हा केवळ दिशादर्शकच ठरला नाही, तर प्रतिकूल परिस्थितीतही कारखान्याने आपल्या शेतकरी सभासदांचे आणि ऊस उत्पादकांचे हित जपून त्यांना नेहमीच चांगला भाव दिला आहे. मागील हंगामात कारखान्याने ८ लाख २५ हजार ९९४ मे टन ऊसाचे यशस्वी गाळप केले.
ऊर्जा निर्मितीमध्येही कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी करत ७ कोटी ८९ लाख युनिट वीज तयार केली, ज्यापैकी ५ कोटी २८ लाख ९३ हजार युनिट वीज निर्यात करून ३८ कोटी ७१ लाख रुपयांचा भरीव नफा मिळवला. या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीमुळेच कारखान्याला राष्ट्रीय स्तरावर ‘कन्सिस्टंट परफॉर्मन्स’ (सातत्यपूर्ण कामगिरी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील वर्षी दिल्ली येथेही थोरात कारखान्याला याच पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

या सन्मान सोहळ्यात बोलताना शरद पवार म्हणाले की, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी ताकद मिळाली आहे. सहकार चळवळ टिकून राहणे आणि तिचा विकास होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात उच्च आदर्श आणि मूल्ये रुजवली आणि याच मूल्यांच्या आधारावर बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार आज राज्यासाठी एक आदर्श उदाहरण बनला आहे. आगामी काळात साखर उद्योगात अनेक आव्हाने आहेत, त्यामुळे कृषी विभागाने एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग करून हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पी. एन. पाटील, जयप्रकाश दांडेगावकर आणि इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.
कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांनी सांगितले की, थोरात सहकारी साखर कारखान्याने नेहमीच तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. बाळासाहेब थोरात यांच्या सक्षम नेतृत्वाखाली गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे कारखान्याला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हे सर्व यश सांघिक प्रयत्नांचे फलित आहे.
या महत्त्वपूर्ण पुरस्काराबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.

उत्कृष्टतेचा वारसा! सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय सन्मान… बाळासाहेब थोरात यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने नेहमीच आपल्या शेतकरी सभासदांचा आणि नागरिकांचा विश्वास जपला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही विक्रमी ऊस गाळप करत कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला आहे. यावर्षी कारखान्याने ८ लाख २५ हजार ९९४ मे टन ऊसाचे गाळप केले असून सरासरी साखर उतारा ११.५० राखला आहे. यासोबतच ७ कोटी ८९ लाख युनिट वीज निर्मिती केली आहे. याच उत्कृष्ट कामगिरीमुळे नॅशनल को-जनरेशन फेडरेशनने सलग दुसऱ्या वर्षी थोरात कारखान्याला सातत्यपूर्ण कामगिरीचा पुरस्कार प्रदान केला आहे. – जगन्नाथ घुगरकर, कार्यकारी संचालक.

