महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संगमनेर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, तहसीलदार धीरज मांजरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, कैलास ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र मोठे असल्याने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मध्यप्रदेशातील मोहनपुरा आणि कुंडलिया जलाशयांप्रमाणे स्काडा प्रणालीचा वापर करून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन कालव्यांच्या अस्तरीकरणाबाबत एकत्रित अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. निळवंडे लाभक्षेत्रातील रस्त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेतली जाईल. निळवंडे प्रकल्पासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मंत्रिमंडळासमोर अहवाल सादर करून पाठपुरावा केला जाईल. निळवंडे जलाशयाला स्व. मधुकरराव पिचड यांचे नाव देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.
या बैठकीत आमदार डॉ. किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड यांनीही आपले विचार मांडले आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या समस्यांवर जलसंपदा विभाग प्राधान्य देईल आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मतांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले.


