
महाराष्ट्र संवाद न्यूज – पनवेल
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणात आज पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेले इतर दोन आरोपी, कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर, यांना प्रत्येकी सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. मिरा रोड परिसरात २०१६ साली सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिंद्रे यांच्यामध्ये वैयक्तिक वाद होते, असा आरोप होता. हत्येनंतर आरोपींनी अश्विनी बिंद्रे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केला, असे तपासात निष्पन्न झाले होते.

अभय कुरुंदकरने साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांच्या मदतीने अश्विनी बिंद्रे यांच्या मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या कटरने लहान तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे काही काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले आणि नंतर ते वसईच्या खाडीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले. या अमानुष कृत्याने संपूर्ण पोलीस दलासह राज्यातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.
पनवेल सत्र न्यायालय अभय कुरुंदकर आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणार की जन्मठेप, याबद्दल मोठी उत्सुकता होती. अश्विनी बिंद्रे यांचे कुटुंबीय, पोलीस दल, विविध महिला संघटना आणि सामान्य नागरिक या निकालाकडे डोळे लावून बसले होते. अखेर, न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देत मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर त्याच्या दोन साथीदारांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. या निकालामुळे बिंद्रे कुटुंबियांना काही प्रमाणात न्याय मिळाल्याची भावना आहे.


