
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
गुरुवार, दि. २४ एप्रिल – लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या पत्रकार रमजान नजीर शेख याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी यांच्याकडे खडी वाहतूक करणारे चार ट्रक आहेत. २० मार्च २०२५ रोजी तलाठी अक्षय ढोकळे यांनी दोन ट्रकवर खोटी कारवाई करून प्रत्येकी एक लाख तेवीस हजार रुपये दंड आकारला होता. अर्जदार रमजान शेख हे मांडवे गावात पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी फिर्यादीला तलाठी अक्षय ढोकळे यांच्याशी भेट करून देण्याची मध्यस्थी केली, जेणेकरून ‘सेटलमेंट’ करता येईल. मात्र, तलाठी लाच मागणार, या विचाराने फिर्यादीने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

फिर्यादीने तलाठी अक्षय ढोकळे यांना खडी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी विनंती केली, तेव्हा ढोकळे यांनी दरमहा ४० हजार रुपये लाच मागितली. मात्र कोणते कारवाई न करण्यासाठी फिर्यादीने पन्नास हजार रुपये देण्याचे मान्य केले. नंतर, १६ एप्रिल २०२५ रोजी लाच प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि रमजान शेख यांनी तलाठी अक्षय ढोकळे यांच्यासाठी फिर्यादीकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले. पत्रकार शेख आठवडाभरापासून तुरुंगात आहे.
अर्जदार शेख याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, गुन्ह्यात जास्तीत जास्त सात वर्षं शिक्षेची तरतूद आहे, अर्जदार सरकारी कर्मचारी नाही आणि तपास पूर्ण झाला आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळावा. तर, सरकारी वकिलांनी जामीनाला विरोध केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आणि आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर पत्रकार रमजान नजीर शेख याला जामीन मंजूर केला.
लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गेल्या आठवड्यापासून महसूल आणि माध्यमांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला होता.



