महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने जाहीर केलेल्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत गुणवत्तेच्या क्रमवारीत संगमनेर बाजार समितीने अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम, तर संपूर्ण नाशिक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती सभापती शंकरराव खेमनर आणि सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली.

महाराष्ट्र सरकारच्या पणन विभागाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यातील तब्बल ३०५ बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी नुकतीच जाहीर केली. यासाठी निबंधक आणि सहाय्यक निबंधक यांनी कसून तपासणी करून विविध निकषांनुसार मूल्यांकन केले होते. या मूल्यांकनात २०२३-२४ या वर्षासाठी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्कृष्ट कामगिरी करत अहिल्यानगर जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला, तर नाशिक विभागातील सर्व बाजार समित्यांमध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि व्यापारी बांधवांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवण्यावर भर दिला आहे. संगणकीय कामकाज, उपबाजार समित्यांचे प्रभावी व्यवस्थापन, उत्कृष्ट स्वच्छता आणि कामकाजातील विश्वासार्हता यांसारख्या महत्त्वाच्या निकषांवर संगमनेर बाजार समिती नेहमीच अग्रेसर राहिली आहे. विशेष म्हणजे, यावर्षी सलग दुसऱ्यांदा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीमध्ये बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, उपसभापती गीताराम गायकवाड, संचालक कैलास पानसरे, सुरेश कान्होरे, सतीश खताळ, मनीष गोपाळे, अरुण वाघ, विजय सातपुते, सुधाकर ताजणे, सखाराम शेरमाळे, अनिल घुगे, निलेश कडलग, संजय खरात, मनसुख भंडारी, निसार शेख, सचिन करपे, दिपाली वर्पे, रुक्मिणी साकुरे आणि सचिव सतीश गुंजाळ यांच्यासह सर्व संचालक मंडळाने सातत्याने परिश्रम घेतले आहेत.
संगमनेर बाजार समितीच्या या यशाबद्दल माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


