महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर
एमआयडीसी परिसरात बासमती तांदळाच्या नावाखाली अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल ६२ लाख रुपये किमतीचा बनावट तांदळाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसीमधील एका संशयित आस्थापनाच्या गोदामावर अचानक छापा टाकला. या तपासणीत धक्कादायक सत्य समोर आले.
साध्या, निकृष्ट दर्जाच्या तांदळावर घातक रासायनिक पावडर फवारून त्याला कृत्रिम सुगंध देण्यात येत होता आणि बासमतीचा बनावटी भास निर्माण केला जात होता. इतकेच नव्हे, तर हा विषारी आणि बनावट तांदूळ आकर्षक अशा ‘खुशी गोल्ड’ या ब्रँडच्या बॅगांमध्ये पॅक करून सरळ ग्राहकांच्या माथी मारला जात होता.
अन्न व औषध प्रशासनाच्या सतर्क अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात साठवलेला बनावट तांदूळ आणि त्याला सुगंधित करण्यासाठी वापरण्यात येणारी रासायनिक पावडर जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत तब्बल ६२ लाख रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या बनावट तांदळाचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सहाय्यक आयुक्त सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, नमुना सहाय्यक सागर शेवंते व शुभम भस्मे यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई शुक्रवारी रात्री केली. या गंभीर प्रकरणाचा कसून तपास अन्न सुरक्षा अधिकारी श्री. बडे स्वतः करत आहेत.
या कारवाईदरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बनावट तांदळाचे उत्पादन करणाऱ्या आस्थापनाचे अहिल्यानगर शहरातील दाळमंडई परिसरातही दुकान असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दुकानातूनही या बनावट बासमती तांदळाची विक्री होत असल्याचा दाट संशय असून, प्रशासनाकडून या दिशेनेही कसून चौकशी सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. मात्र, या घटनेमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अन्नपदार्थ खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बनावटगिरी करणाऱ्या अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.


