महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर:
संगमनेरकरांचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान जयंती उत्सवात चांगलाच गदारोळ झाला. या संदर्भात पंधरा दिवसांच्या अंतरानंतर तब्बल दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यानंतर आता हनुमान विजय रथावर जयंती उत्सव समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी नावाच्या पाट्या लावल्याने हिंदुत्ववादी युवक संतप्त झाले आहेत. युवक कार्यकर्त्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत, हनुमान जयंती आणि विजय रथ जणू काही खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वापरले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

काही ठराविक लोकांकडून ग्रामदैवताच्या या महत्त्वपूर्ण उत्सवाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी आणि खासगी मालमत्तेसारखा केला जात आहे, यामागे काही लोकांचा राजकीय स्वार्थ दडलेला असल्याचा गंभीर आरोपही या युवकांकडून निवेदनात करण्यात आला आहे.
वादाला तोंड फुटले… हनुमान जयंतीच्या दिवशी जेव्हा हिंदुराजा ढोल ताशा पथक विजय रथासमोर सलामी देण्यासाठी आले, तेव्हा त्यांना ढोल वाजवण्यास आणि सलामी देण्यास मनाई करण्यात आली. यामुळे जयंती उत्सव समितीचे सदस्य आणि ढोल ताशा पथकातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, इतकेच नव्हे तर धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचे म्हटले आहे. यानंतर जयंती समितीने पोलिसात तक्रार दाखल करून हिंदुत्ववादी युवकांविरोधात गुन्हे नोंदवले. यात एका अल्पवयीन मुलाचा देखील आरोपींमध्ये समावेश करण्यात आला होता. तर दुसऱ्या गटाची फिर्याद घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. त्यामुळे याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववादी युवकांनी प्रशासनावरील दबाव वाढवत तब्बल पंधरा दिवसानंतर पोलिसांना समितीच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. यामुळे परिसरातील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले असून, हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
युवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हनुमान जयंती उत्सवाची मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. परंतु, काही विघ्नसंतोषी लोक या परंपरेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुराजा ढोल ताशा पथक हे स्थानिक युवकांचे असून ते अनेक वर्षांपासून रथाला सलामी देत आले आहेत. असे असतानाही त्यांना नाहक विरोध करणे आणि जयंती उत्सव समितीकडून कार्यक्रमाचे खासगीकरण करण्याच्या उद्देशाने इतरांना विरोध करणे योग्य नाही.
चंद्रशेखर चौकातील हनुमान मंदिर हे संपूर्ण गावाचे श्रद्धास्थान आहे आणि या उत्सवासाठी संपूर्ण गावातून वर्गणी जमा केली जाते. मात्र, काही लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी या उत्सवाला खासगी मालमत्तेप्रमाणे वागवत आहेत. रथावर स्वतःची नावे आणि फोटो लावणे हे अत्यंत निंदनीय आहे. या कृत्यांमुळे काही लोक या रथोत्सवाला आपली खाजगी मालमत्ता म्हणून मिरवत आहेत, ज्याला स्थानिक लोकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे उत्सवाचे हे खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही, असे स्पष्ट मत निवेदनात मांडण्यात आले आहे.

विरोध करणाऱ्या हिंदुत्ववादी युवकांना त्रास देण्यासाठी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एका १६ वर्षांच्या मुलाचे नावही गंभीर गुन्ह्यात टाकण्यात आले आहे. काही ‘झारीतील शुक्राचार्य’ त्याचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या निवेदनावर राहुल शशिकांत नेहूलकर, विनायक पुंडलिक गरुडकर, ललित प्रवीण परदेशी, ललित शरद शिंपी, मयूर विनायक जाधव, शुभम मनोज परदेशी, महेंद्र नंदकिशोर भालारे यांच्यासह अनेक युवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या गंभीर आरोपांमुळे संगमनेरातील हनुमान जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वाद अधिकच गंभीर बनला असून, यावर भविष्यात काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“अनेक वर्षांपासून चालत आलेल्या हनुमान विजय रथाच्या मिरवणुकीची एक गौरवशाली परंपरा आहे. अनेक आदरणीय व्यक्तींनी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. रथ अनेकदा दुरुस्त केला गेला, सजवला गेला, पण कुणीही त्यावर स्वतःचे नाव टाकण्याचा विचार केला नाही. आता अचानक आलेल्या काही मंडळींना केवळ स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे म्हणून ते रथावर नावे टाकून या पवित्र उत्सवाचे खासगीकरण करत आहेत. हे अजिबात योग्य नाही. ही संपूर्ण गावाची मिरवणूक आहे. ज्यांना स्वतःचे नाव मिरवायचे आहे, त्यांनी स्वतःची वेगळी मिरवणूक काढावी!” – राहुल नेहुलकर.



