महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
निळवंडे धरणाचे पाणी डोळ्यासमोरून वाहत असतानाही या पाण्यापासून संगमनेर तालुक्याला वारंवार डावलले जात असल्याने शेतकऱ्यांचा संयम आता तुटला आहे. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता कालव्यावरील शेतकऱ्यांचे पाणी उपसण्याचे पाईप मध्यरात्री तोडल्याने संतप्त सुमारे ५०० शेतकऱ्यांनी एकत्र येत शिरापूर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. रात्रभर चाललेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी जलसंपदा विभाग आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध केला.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण आणि त्याचे डावे-उजवे कालवे पूर्ण झाले. या कालव्यांचे तीन आवर्तन झाले असले तरी, प्रत्येक वेळी संगमनेर तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले. सध्या उन्हाळी आवर्तनात पाणी सुरू असतानाही संगमनेर तालुक्यातून पाणी पुढे जात आहे, मात्र येथील शेतकरी पाण्यासाठी तरसले आहेत.
या पार्श्वभूमीवर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांची गरज ओळखून सुमारे दोन कोटी रुपयांचे पाईप उपलब्ध करून दिले. या पाईपच्या साहाय्याने उजव्या कालव्यावरील निमगाव खुर्द ते खळी आणि डाव्या कालव्यावरील पिंपळगाव कोंझिरा ते लोहारे येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी पाणी उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची गरज असतानाही प्रशासनाने कोणतीही सहानुभूती न दाखवता मध्यरात्री येत हे पाईप तोडून टाकले.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी तातडीने इंद्रजित थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिरापूर येथे एकत्र येत आंदोलनाला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र शेतकऱ्यांची न्याय्य मागणी ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जलसंधारण अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. इंद्रजित थोरात यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांची बाजू प्रशासनासमोर मांडली. अखेर, अधिकाऱ्यांनी यापुढे शेतकऱ्यांचे पाईप तोडणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.

यावेळी बोलताना तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय राहणे यांनी प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर जोरदार टीका केली. “संगमनेर तालुक्याबाहेरील १६ किलोमीटर लांबीसाठी २० दिवस पाणी आणि आपल्याच तालुक्यातील ७५ किलोमीटर लांबीच्या कालव्यासाठी फक्त १७ दिवस पाणी, हा कोणता न्याय आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
अनेक शेतकऱ्यांनी स्थानिक आमदारांवर निष्क्रियतेचा आरोप केला. “आमदार केवळ तलाव आणि बंधारे भरण्याच्या घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात पाणी मिळत नाही आणि शेतकऱ्यांचे पाईप तोडले जातात, यावर ते काहीही बोलत नाहीत. प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे?” असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला.
इंद्रजित थोरात यांनी शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची ग्वाही दिली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या कामाचा दाखला देत, तालुक्याला पाणी मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत झाले असले, तरी शेतकऱ्यांमधील असंतोष अजूनही कायम आहे. रात्रभर रस्त्यावर उतरलेल्या शेकडो महिला व पुरुषांनी प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे कालव्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
इंद्रजित थोरात यांनी दाखवली शेतकऱ्यांप्रति बांधिलकी… माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण करून संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले. मात्र, सत्तांतरानंतर तालुक्याला उपेक्षित ठेवले जात आहे. अशा परिस्थितीत इंद्रजित थोरात यांनी रात्री-अपरात्री कालव्यांवर फिरून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माजी मंत्र्यांनी दिलेल्या पाईपामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता, परंतु अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.


