
संगमनेर – प्रतिनिधी
केंद्र सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे आमदार अमोल खताळ यांनी स्वागत केले आहे.
या संदर्भात बोलताना आमदार खताळ म्हणाले, “जातनिहाय जनगणना हा मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक वर्षांपासून होता. मात्र, त्यांचे सरकार सत्तेवर असताना गेल्या ६५ वर्षांत त्यांनी या महत्त्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या या भूमिकेमुळे समाजात अनेक जाती-जमातींमध्ये गैरसमज आणि संघर्ष निर्माण झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल.”

काँग्रेसच्या धोरणांमुळे अनेक जातींमध्ये भेदभाव वाढला आणि अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. आता या जनगणनेमुळे आरक्षणासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर योग्य तोडगा निघेल. या जनगणनेमुळे सामाजिक परिस्थितीची अचूक नोंद होईल. कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे, त्यांची शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती काय आहे आणि प्रशासनात त्यांचा सहभाग किती आहे, याची माहिती सहज उपलब्ध होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला विविध सामाजिक गटांच्या गरजा ओळखून अधिक प्रभावी आणि पारदर्शक योजना राबविणे शक्य होईल.
“संविधानाने दिलेल्या समान संधीच्या अधिकारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी ही जनगणना एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरेल,” जातिनिहाय जनगणनेमुळे लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व सुनिश्चित करता येईल. तसेच, विविध जातींच्या न्याय्य मागण्यांना बळ मिळेल.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा हा निर्णय केवळ राजकीय नसून, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक ऐतिहासिक पाऊल आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारा हा निर्णय निश्चितच देशाच्या सामाजिक विकासाचा चेहरा बदलणारा ठरेल, असे खताळ यांनी म्हटलं आहे.


