महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
“चाळीस वर्षे अविश्रांत काम करून दुष्काळग्रस्तांसाठी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले. आपल्या तालुक्याला आणि सहकारी संस्थांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. मात्र, जाती-धर्माच्या नावाखाली पसरवलेल्या खोट्या भूलथापांना बळी पडून जनतेने हे कवच गमावले आहे. आता तालुक्याचे हक्काचे पाणी मिळवण्यासोबतच तालुक्याला जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर खुर्द येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी युवक आणि कार्यकर्त्यांच्या स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, संपतराव डोंगरे, पांडुरंग पा. घुले, आर. बी. रहाणे, अर्चना बालोडे, नवनिर्वाचित संचालक रामनाथ कुटे, विनोद हासे, विजय राहणे, विलास शिंदे, अंकुश ताजणे, दिलीप नागरे, राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर, भाऊराव रहाणे, सरपंच गणेश शिंदे, मधुकर गुंजाळ, रमेश सुपेकर यांच्यासह परिसरातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, “मागील विधानसभा निवडणुकीत धर्माच्या नावावर जनतेची फसवणूक झाली. निवडणुकीनंतर तालुक्याची घडी विस्कटली आहे. सरळ विरोधक परवडले, पण दुटप्पी भूमिका घेणारे नकोत. आपला तालुका एक कुटुंब आहे आणि चुकीच्या वागण्याचा फटका सगळ्यांना बसतो. मागील ४० वर्षांत एकही दिवस विश्रांती न घेता काम केले. हक्काचे पाणी संगमनेर तालुक्याला मिळायलाच पाहिजे. कालव्यांना प्लास्टरचे काम सुरू झाले आहे आणि आपली पहिली मागणी होती की, अगोदर तालुक्यातील शेतकऱ्यांचे बारे काढून मगच प्लास्टर करावे. हे पाणी सर्वांना मिळणे आवश्यक आहे आणि आता ते काम सुरू आहे.”

आमदारकी हे तालुका आणि सहकारी संस्थांसाठी मोठे संरक्षण कवच होते, परंतु जनतेने ते गमावले आणि त्याचे दुष्परिणाम आता लगेच जाणवू लागले आहेत, असे नमूद करत थोरात म्हणाले, “शहराजवळील गावांना आश्वी अप्पर तहसील कार्यालयाला जोडण्याचा डाव आहे, तर शहरात अशांतता निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती. आपली सुसंस्कृत राजकारण आणि संस्कृती टिकवण्यासाठी आपल्यातील मतभेद विसरून तालुक्याच्या कुटुंबासाठी एकजूट होऊन संघर्ष करावा लागेल.”
कारखान्याने नेहमी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नियमांनुसार काम केले असून, आगामी काळात प्रति एकरी शंभर टन ऊस उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊस उत्पादन वाढल्यास राज्यात एक नंबरचा भाव देणे शक्य होईल. तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे काम उत्तम असून, ते विरोधकांनाही मान्य आहे. विधानसभेत चूक झाली असेल, पण आता सहकारी संस्थांबाबत कोणतीही चूक होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. झालेल्या चुका सुधारून सर्वांनी एकजुटीने तालुक्याच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माधवराव कानवडे आणि बाबा ओहोळ यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पाटील गुंजाळ यांनी केले, तर रवी नेहे यांनी आभार मानले. चंदनापुरी, आनंदवाडी, झोळे, संगमनेर खुर्द, खांडगाव, यशवंतनगर, निमज, सावरगाव तळ येथील सभासद शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे पाईप अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून फोडले?…
संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळायलाच पाहिजे. कालव्यांवरील भागातील शेतकऱ्यांना त्यांचे पाणी देण्यासाठी तातडीने काम झाले पाहिजे. आम्ही हक्काचे पाणी मागत आहोत आणि ते मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पाईप टाकले. हे पाईप अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून फोडले, असा सवाल थोरात यांनी केला. “मंत्री महोदय असा चुकीचा आदेश देतील असे मला वाटत नाही. मग हे पाईप फोडण्याचे धाडस कसे झाले? कोणाच्या आदेशावरून पाईप फोडले? शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी. खालच्या भागातील शेतकरीसुद्धा आपलेच आहेत, परंतु समन्वय साधून प्रश्न सोडवता येतो. पाणी मिळाले नसताना अनेक ग्रामपंचायतींना पाणीपट्टीच्या नोटिसा आल्या आहेत. पहिले शेतात पाणी द्या, मग पाणीपट्टी भरतो,” असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रवरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना १८ तास लाईट मिळायला हवी, पण रोटेशन चालू असताना पाच ताससुद्धा लाईट मिळत नाही. हे काय सुरू आहे? आता आपल्या तालुक्याच्या संरक्षणाचे आमदारकीचे कवच नसल्याने हा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन संघर्षासाठी तयार राहा, असे आवाहन थोरात यांनी केले.



