महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
धावपळीच्या जीवनात सकस आहाराची गरज असताना, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे अन्नाची गुणवत्ता घटत आहे. निरोगी समाजासाठी विषमुक्त शेती अत्यावश्यक आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने द्रोणागिरी हॉलमध्ये ‘शाश्वत शेती व युवा उद्योजक’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. तांबे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मनोहर पाचोरे होते. व्यासपीठावर राहुरी कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुर्गुडे, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. प्रशांत नाईकवाडी, डॉ. प्रशांत सावंत, अरविंद औताडे, डॉ. बाळासाहेब राहणे, नारायणराव उगले, नरेश माळवे, डॉ. बाळासाहेब वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ आणि प्रा. जी. बी. बाचकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. तांबे म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश असून आजही ५५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत, परंतु राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा वाटा केवळ १५ टक्के आहे. त्यामुळे शेतीवरील अवलंबितांचे प्रमाण अधिक आणि उत्पादन कमी, अशी स्थिती आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतीत आधुनिकीकरण अत्यंत गरजेचे आहे.
कमी श्रम, कमी वेळ, कमी पैसा आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. विषमुक्त शेती आजच्या काळाची गरज आहे आणि निरोगी समाजासाठी निरोगी अन्न महत्त्वाचे आहे. जमिनीचा पोत सुधारणे आणि आवश्यक पोषक तत्वे जमिनीत टाकणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, शेतीसाठी कंपोस्ट खताचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. पूर्वी खतासाठी खड्डे केले जात होते, परंतु आता ते प्रमाण कमी झाल्याने कंपोस्ट खताची उपलब्धता घटली आहे. शेतीला हवा, ऊन आणि पाण्याची योग्य मात्रा मिळणेही आवश्यक आहे.
शेती व्यवसायात महिलांचा सहभाग मोठा आहे आणि तरुणांनी शेतीला केवळ पारंपरिक व्यवसाय न मानता एक संधी म्हणून पाहिले, तर निश्चितच मोठे यश मिळू शकते. आज अनेक उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वळले आहेत, ही सकारात्मक बाब आहे. आगामी काळात सेंद्रिय शेतीला मोठे महत्त्व येणार असून, सेंद्रिय उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे. ऊस हे शाश्वत उत्पादन असून शेतकऱ्यांनी एकरी १०० टक्के उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही डॉ. तांबे यांनी केले.
डॉ. राजेंद्र दुर्गुडे यांनी शेतीमधील जमिनीचा पोत, शेतीचे विविध प्रकार, माती परीक्षण आणि आवश्यक सेंद्रिय खतांच्या पुरवठ्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. प्रशांत नाईकवाडी, प्रशांत सावंत, डॉ. बाळासाहेब राहणे आणि डॉ. मनोहर पाचोरे यांनीही सेंद्रिय शेतीबाबत आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. विठ्ठल शेवाळे, संजय वाकचौरे, डॉ. विलास भांगरे, अनिल देशमुख, राधाकृष्ण गुळवे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. नामदेव कहांडळ यांनी केले. प्रा. जी. बी. बाचकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेसाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील शेतकरी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
थोरात कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतीवर विविध प्रयोग
महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर माती परीक्षण, हवामान आणि सेंद्रिय खतांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले जाते. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी नवीन उत्पादनांबाबत प्रयोग करून शेतकऱ्यांना त्यात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. तांबे यांनी केले.