
अहिल्यानगर –
आता राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नागरिकांसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू होणार आहेत. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ऑनलाइन सेवांसाठी अर्ज स्वीकारले जातील आणि नागरिकांना आवश्यक सेवा पुरवल्या जातील.
यापूर्वी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र ग्रामपंचायती आणि खाजगी व्यक्तींमार्फत चालवली जात होती. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या १२४२ ग्रामपंचायती आणि ८४१ खाजगी केंद्रांच्या माध्यमातून एकूण २०८३ केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांद्वारे राज्य सरकारच्या विविध विभागांच्या एकूण ७० अधिसूचित सेवा ऑनलाइन पद्धतीने पुरवल्या जातात. आता याच सेवा शहर भागातील नागरिकांसाठी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील सर्व महापालिका आयुक्त तसेच प्रशासक आणि नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू करावयाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील ‘एनआयसी’ केंद्राकडून या पालिकांसाठी स्वतंत्र ‘युजर आयडी’ प्राप्त करायचे आहेत. त्याचप्रमाणे, ‘आपले सरकार’ पोर्टलवरून पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवांसाठी ‘महाआयटी’ महामंडळाकडून ‘युजर आयडी’ मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठवावे लागणार आहेत.
‘महाआयटी’ महामंडळाने या केंद्रांना ऑनलाइन अर्जाचे शुल्क स्वीकारण्यासाठी त्वरित ‘वॉलेट’ सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून आता राज्य सरकारच्या सर्व विभागांच्या ऑनलाइन सेवांचे अर्ज स्वीकारले जातील आणि आवश्यक कागदपत्रांची संगणकीय प्रत (प्रिंटआउट) देण्याची प्रक्रिया पालिका स्तरावर पूर्ण केली जाईल.
शहरातील नागरिकांना सर्वसमावेशक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनीही यापूर्वी मनपा, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमार्फत केंद्रे सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता हा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे आता शहरातील नागरिकांना शासकीय सेवा मिळवणे अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे.


