संगमनेर – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाने डॉ. अमोल कर्पे याने वैद्यकीय क्षेत्राची लाज चव्हाट्यावर आणली असतानाच आता आणखी एका हृदयद्रावक घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. एका गर्भवती महिलेला गर्भपात करायचा होता आणि या प्रयत्नात तिला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने आरोग्य यंत्रणेतील त्रुटी आणि संगमनेरमधील काही डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला देण्यात आलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांमुळे झालेल्या त्रासातून गर्भपात करताना तालुक्यातील एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. महिलेला दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांमुळे महिलेची तब्येत बिघडली. त्यानंतर संगमनेर शहरातील एका प्रतिष्ठित ‘प्रवीण’ डॉक्टरने महिलेची शारीरिक स्थिती गंभीर असताना तिला रुग्णालयात दाखल करून अशा गंभीर स्थितीत तिचा बेकायदेशीर गर्भपात करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पतीपासून विभक्त राहणाऱ्या आणि संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात राहावयास असलेल्या वैशालीला (नाव बदललेले आहे) तिसऱ्यांदा गर्भधारणा झाली होती. पतीपासून विभक्त असताना गर्भधारणा झाल्याने ती महिला मानसिक तणावाखाली होती. यासंदर्भातील एका तक्रारीत नमूद केल्यानुसार, ३० मार्च २०२५ रोजी महिलेने स्वतःहून गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या किंवा कुणीतरी तिला त्या गोळ्या दिल्या. या गोळ्यांच्या सेवनानंतर महिलेला असह्य त्रास सुरू झाला. रक्तस्राव आणि पोटदुखीने महिला हैराण झाली. परिस्थिती बिघडल्यामुळे या महिलेला तातडीने पूर्वेकडील एका गावातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तेथे त्यांच्यावर सलग तीन दिवस उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवसांच्या उपचारानंतरही महिलेच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही, उलट रक्तस्राव वाढतच गेला, ज्यामुळे तिची स्थिती अधिक गंभीर झाली. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यावर, महिलेला पुढील उपचारासाठी संगमनेर शहरातील एका ‘धन्वंतरी’च्या उपासकाकडे दाखल करावे लागले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय व्यवसायात ‘प्रवीण’ असलेला डॉक्टरने या महिलेवर उपचार सुरू केले.
उपचारादरम्यान महिलेच्या शरीरात अतिशय कमी प्रमाणात रक्त शिल्लक होते. वैद्यकीय दृष्ट्या ही अत्यंत गंभीर आणि धोकादायक स्थितीत होती. असे असूनही, या महिलेची शारीरिक क्षमता आणि धोके यांचा पुरेसा विचार न करता गर्भपात प्रक्रिया पूर्ण करत तिच्या गर्भाशयातील गर्भ काढला गेला. या गर्भपात प्रक्रियेदरम्यान महिलेच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला, ज्यामुळे तिची प्रकृती आणखी खालावली.
गर्भपातादरम्यान महिलेचा जीव वाचवणे कठीण आहे, गर्भपात प्रक्रियेदरम्यान प्रकृती खालावली असल्याचे धन्वंतरीचा उपासक असलेल्या डॉक्टरच्या ही बाब लक्षात आल्याने या महिलेला तातडीने संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या शेजारच्या तालुक्यातील एका बड्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.
आधी गावातील छोट्या, नंतर शहरातील मोठ्या आणि शेवटी तातडीने या महिलेला शेजारच्या तालुक्यातील बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने या रुग्णालयात काही वेळातच तिने अखेरचा श्वास घेतला. (क्रमश:)


