महाराष्ट्र संवाद न्यूज –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचार आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. या प्रकरणी दोन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

सहाय्यक महसूल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोन तलाठ्यांनी मुख्यालयात थांबण्याचे आदेश असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला, ज्यामुळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाले.
ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्याचा आरोप केला होता आणि तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी तातडीने दोन्ही तलाठ्यांचे निलंबनाचे आदेश जारी केले.

या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतही त्रुटी आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, कार्यक्रमांवर योग्य नियंत्रण न ठेवल्याबद्दल संपर्क अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील आणि उपविभागीय महसूल अधिकारी जगदीश काकतकर यांनाही नोटीस जारी करून खुलासा मागितला आहे. ‘झेड प्लस’ सुरक्षा असताना तलाठ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश कसा मिळवला, याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.


