भाग – २
संगमनेर | अनंत पांगारकर
अधिकृत गर्भपात केंद्र नसताना देखील रुग्णालयातील डॉक्टरने गर्भपातासंदर्भातील कायदा आणि नियम बाजूला ठेवत महिलेचा गर्भपात करण्याचे धाडस कसे दाखविले. महिलेची प्रकृती हाताबाहेर गेल्यानंतर तिला थेट दुसऱ्या तालुक्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर तेथे या महिलेच्या मृत्यू झाला. याची माहिती शहरात कानोकानी बहुतांश ठिकाणी पसरली. त्यामुळे आता या दुर्दैवी घटनेनंतर संगमनेर शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी ‘ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकरणावर आवाज उठवला आहे.
त्यांनी सलग चार ते पाच दिवस या घटनेची सखोल माहिती मिळवली आणि २ मे २०२५ रोजी अहमदनगर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे एक विस्तृत तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रार अर्जात त्यांनी संगमनेर आणि तालुक्यातील रुग्णालयातील कथित डॉक्टरांच्या बेजबाबदार कारभारावर गंभीर आरोप केले आहेत.
‘ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्षा असलेल्या बानोबी शेख यांनी आपल्या तक्रारीत वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ आणि त्यात २०२० मध्ये झालेल्या सुधारणांचा हवाला दिला आहे. या कायद्यानुसार, कोणत्याही गर्भवती महिलेचा गर्भपात करायचा असल्यास, तो २४ आठवड्यांपर्यंत केवळ शासनमान्य गर्भपात केंद्र आणि नोंदणीकृत व प्रशिक्षण घेतलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांकडूनच करणे अपेक्षित आहे. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास तो अजामीनपात्र गुन्हा ठरतो, असे असतानाही या प्रकरणात कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेख यांनी आपल्या तक्रारीत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले आहे की, संबंधित महिलेला गर्भपात करण्यासाठी ज्या गोळ्या दिल्या गेल्या, त्या गावातील महिला डॉक्टरच्या दवाखान्यात उपचार घेत असताना त्यांच्याच सल्ल्याने दिल्या गेल्या होत्या का, याची सखोल चौकशी व्हायला हवी. तसेच, संगमनेर शहरातील बड्या रुग्णालयात अधिकृत गर्भपात केंद्र नसतानाही त्यांनी ही जोखमीची प्रक्रिया का केली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. महिलेची गंभीर स्थिती आणि तिच्या जीवाला असलेला धोका माहीत असूनही, हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी गर्भपात करण्यापूर्वी आरोग्य अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना तातडीने कळवणे आणि एमएलसी (Medico-Legal Case) दाखल करणे बंधनकारक होते, परंतु त्यांनी तसे केले नाही, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, या निष्काळजीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाला आणि त्यामुळे या प्रकरणातील बरेच पुरावे नष्ट करण्याचा आणि माहिती दाबण्याचा प्रयत्न झाला असण्याची दाट शक्यता आहे.
शेख यांनी मागणी केली आहे की, ज्या पुरुषाने महिलेला गर्भधारण करण्यास आणि नंतर गर्भपात करण्यास प्रवृत्त केले त्याची आणि गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या पूर्वेकडील गावातील डॉक्टरसह संबंधित मेडिकल स्टोअर चालक-मालकाची कसून चौकशी करण्यात यावी. यासोबतच, त्यांनी महिला डॉक्टरसह डॉक्टर पतीवर देखील गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी नसतानाही ते रुग्णांची तपासणी करतात आणि उपचार करतात, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिल्याचे आणि गावातील नागरिकांमध्ये याबाबत चर्चा असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे या डॉक्टर दाम्पत्यामध्ये ‘मुन्नाभाई’ डॉक्टर कोण आहे, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शेख यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे. जे कोणी या प्रकरणात दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, आरोग्य अधिकारी या प्रकरणात खरोखर कायद्यानुसार कारवाई करतात की केवळ दिखावा करतात आणि यापुढेही रुग्णांचे असेच बळी जाऊ देतात. या दुर्दैवी घटनेमुळे महिलेने आपला जीव गमावला असून, तिच्या पश्चात दोन अनाथ मुलींना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे. (क्रमश:)

