रविवार, दि. १८ मे – संगमनेर
प्रत्येकाच्या आयुष्यात एक अनमोल कथा दडलेली असते आणि जीवनात मागे वळून सिंहावलोकन करणे महत्त्वाचे आहे. प्रकाशवाट हे पुस्तक कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. या पुस्तकाचे लेखक संतोष खेडलेकर संगमनेरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांच्या जीवनप्रवासावर आधारित डॉ. संतोष खेडलेकर लिखित ‘प्रकाशवाट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, संजीवनी जोशी, श्रीमती प्रभावती जोशी, डॉ. जयश्री थोरात आणि माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, संघर्षातून मिळणारे यश अधिक समाधानाचे असते. जोशी यांनी आपल्या संस्कारांच्या बळावर बँकिंग क्षेत्रात एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. जीवनात चढ-उतार असले तरी, संघर्षातून पुढे गेल्यावर जीवनाचा खरा आनंद मिळतो, असेही ते म्हणाले.
डॉ. सुधीर तांबे यांनी खेडलेकर यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव केला, तर आमदार सत्यजित तांबे यांनी सुधाकर जोशी यांच्या मनुष्य जोडण्याच्या वृत्तीचे कौतुक केले. ‘प्रत्येकाने आपल्या जीवनाचा इतिहास लिहावा,’ अशी प्रेरणा या पुस्तकातून मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात डॉ. जयश्री थोरात आणि डॉ. संतोष खेडलेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले, तर सुधाकर जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमादरम्यान संगमनेर डाक विभागातर्फे विशेष पोस्ट तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

या सोहळ्याला साहित्य, शिक्षण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत विष्णुपंत रहाटळ यांनी केले, प्रास्ताविक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले आणि आभार अमेय जोशी यांनी मानले.
डॉ. राजेंद्र धामणे यांचे मानवतेचे कार्य: बाळासाहेब थोरात यांनी डॉ. राजेंद्र धामणे आणि त्यांच्या पत्नी सुचिता यांच्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलांच्या सेवेसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. हे कार्य अत्यंत सेवाभावी आणि परमेश्वरी सेवेसारखे असल्याचे त्यांनी म्हटले.


