
अहिल्यानगर-
अहिल्यानगर जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या आणि अपहरण, खून, चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या एका कुख्यात टोळीवर तोफखाना पोलिसांनी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. ११ जणांच्या या टोळीच्या अटकेमुळे अहिल्यानगरमध्ये पसरलेल्या भीतीला चाप बसला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नवनागापूर आणि आसपासच्या परिसरात या टोळीने गुन्हेगारीचा कळस गाठला होता. चोरी, खंडणी, मारामारी यांसारख्या कृत्यांसोबतच एका व्यक्तीचे अपहरण करून निर्घृण खून करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक दहशतीखाली होते.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत तोफखाना पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले. कसून तपास करत या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्यांच्यावर ‘मकोका’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही टोळी रात्रीच्या वेळी वाहनांमधून फिरून घरफोडी करत असे आणि त्यांचे गुन्हे पूर्वनियोजित पद्धतीने केले जात होते. आर्थिक फायदा मिळवणे आणि परिसरात दहशत निर्माण करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे – अनिकेत विजय सोमवंशी (चेतना कॉलनी, नवनागापूर), सुमित बाळासाहेब थोरात (वय २४, गजानन कॉलनी, नवनागापूर), महेश मारुती पाटील (वय २६), नितीन अशोक ननवरे, करण सुंदर शिंदे (वय २६), विशाल दीपक कापरे (वय २२), रोहित बापूसाहेब गोसावी (वय २०) (सर्व रा. नवनागापूर), विकास अशोक गव्हाणे (वय २३, रा. वडगाव गुप्ता), स्वप्नील रमाकांत पाटील (वय २३), राहुल बंडू पाटोळे (वय १९), व हृतिक मनोज घोडके (वय १९, रा. नवनागापूर)
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष पथकाने अत्यंत नियोजनबद्ध तपास करत सर्व आरोपींना ताब्यात घेतले. सध्या या टोळीच्या इतर साथीदारांवरही पोलिसांची करडी नजर आहे.


