संगमनेर-
संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी येथील अनिल गंगाधर राऊत यांच्या घराजवळ लावलेली टेम्पो ट्रॅव्हलर आणि टाटा विंगर अशी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन चारचाकी वाहने अज्ञात व्यक्तींनी जाळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल गंगाधर राऊत (वय ४६, रा. घुलेवाडी) यांचा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीची टाटा विंगर (क्र. एमएच ०८ आर ८८०४, किंमत २ लाख ९८ हजार रुपये) आणि टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. एमएच ०४ जीपी ३३३२, किंमत ६ लाख ९५ हजार रुपये) ही दोन वाहने त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री घरासमोर पार्क केली होती. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ही दोन्ही वाहने पेटवून दिली.
रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी आणि पहाटे फिरायला निघालेल्या नागरिकांनी ही घटना पाहिल्यानंतर तात्काळ हॉर्न वाजवून राऊत कुटुंबीयांना माहिती दिली. मात्र, घरातील सदस्य बाहेर येईपर्यंत दोन्ही वाहनांनी पूर्णपणे पेट घेतला होता, त्यामुळे आग विझवणे शक्य झाले नाही. या आगीत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेप्रकरणी अनिल राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे करत आहेत.
ग्रामीण भागातही गुन्हेगारीचे लोण… पुणे, मुंबई, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहने जाळण्याच्या घटना वारंवार घडत असतात, पण आता संगमनेरसारख्या ग्रामीण भागातही अशा घटनांचे लोण पसरल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अज्ञात व्यक्तींनी वाहने जाळल्याच्या या घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास लावून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


