संगमनेर – प्रतिनिधी
संगमनेरला सध्या अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येने ग्रासले आहे. मागील काही दिवसांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून ती कधीही येते आणि कधीही जाते, अशी परिस्थिती उद्भवल्याने याचाच परिणाम म्हणून आज (गुरुवारी) काँग्रेससह शहरात नागरिकांनी महावितरण कार्यालयाला घेराव घालून निवेदन दिले. यावेळी आठ दिवसात सुधारणा करा अन्यथा आंदोलन करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

विजेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा महावितरणवर संताप, यांनी दिले निवेदन… संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी सोमेश्वर दिवटे, गजेंद्र अभंग, किशोर टोकसे, नूरमोहम्मद शेख, नितीन अभंग, संतोष मुर्तडक, जावेद पठाण, सुषमा भालेराव, वैशाली बर्गे, रामदास सोनवणे, तुषार अरगडे, श्रावणी खेमनर, कविता साळुंखे, मंगल साळुंखे, जीवन पंचारिया, पूजा पावसे, सुवर्णा शिंदे, संजय कानवडे, सादिक तांबोळी, महेश सानप, लक्ष्मण बर्गे, अभय खोजे, शैलेश कलंत्री, विजय पांढरे, सोनल गांधी, नूतन गांधी, प्रमोद कडलग, मनोजकुमार यंगदाल, मयूर वैराळ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहर व परिसरात अनियमित वीजपुरवठा, कमी-जास्त व्होल्टेज, तुटलेल्या आणि लोंबकळलेल्या तारा, हाय व्होल्टेज लाईनला संरक्षक कवच नसणे अशा अनेक समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे जीवितहानीची शक्यता निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी पोल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. या समस्यांमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याची अनियमितता आणि तांत्रिक समस्या दीर्घकाळ प्रलंबित राहणे ही चिंतेची बाब आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महावितरण कंपनीकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.
आठ दिवसांत उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलन!… महावितरण कार्यालयाने पुढील आठ दिवसांत या सर्व समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच, संगमनेर विभागासाठी एक स्वतंत्र २४ तास हेल्पलाइन नंबर सुरू करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
यावेळी महावितरणचे खेमनर यांनी निवेदन स्वीकारले आणि तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. संगमनेरमधील नागरिकांचा वाढता रोष पाहता, महावितरण या गंभीर समस्येवर काय पाऊले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खंडित होणारा वीजपुरवठा ही चिंतेची बाब
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तीव्र शब्दांत महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मागील सहा महिन्यांपासून संगमनेर शहरासह ग्रामीण भागात विजेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महावितरणने या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे, मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. तालुक्यात सध्या अनियमित वीजपुरवठा सुरू आहे. याबाबत विचारणा केल्यास अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. यावर तातडीने मार्ग काढला नाही, तर तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालयाविरोधात तीव्र निषेध आंदोलन करावे लागणार आहे.




