
अहिल्यानगर / संगमनेर – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी येथील एका कृषी सेवा केंद्रात झालेल्या धाडसी घरफोडीचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने अत्यंत गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या घरफोडीतील तीन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे ८.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंप्रीलौकी येथील व्यापारी संदीप पोपट गिते यांच्या कृषी सेवा केंद्राचे पत्रे उचकटून चोरट्यांनी दुकानातील शेती उपयोगी साहित्य आणि रसायने चोरून नेली होती. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आश्वी पोलीस या प्रकरणी तपास करत होते.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पवार, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, मयुर गायकवाड, प्रशांत राठोड आणि महादेव भांड या पोलीस अंमलदारांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. पथकाला या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली की, काही संशयित व्यक्ती एमएच २१ बीएच ५४४३ या पीकअप गाडीतून अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यालगत असलेल्या आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ शेतीची औषधे संशयास्पदरित्या विकत आहेत.

या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई करत गणेश विठ्ठल आव्हाड (वय २३, रा. गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, अहिल्यानगर), राज संदीप गायकवाड (वय २४, रा. विळद, ता. अहिल्यानगर) आणि आदित्य संतोष इंगोले (वय २३, रा. गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) या तिघांना ताब्यात घेतले.
८.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त!… पीकअप गाडीची तपासणी केली असता, त्यात चोरी केलेली शेतीची औषधे आणि रसायने आढळून आली. पोलिसांनी आरोपींकडून महिंद्रा कंपनीचा पीकअप, विविध प्रकारची कीटकनाशके, औषधे आणि मोबाईल फोन असा एकूण ८ लाख ५७ हजार ३९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी १६ मे रोजी पहाटे पिंप्रीलौकी फाटा, शिबलापूर, ता. संगमनेर येथील कृषी सेवा केंद्रात पत्रे उचकटून चोरी केल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या आरोपींना जप्त मुद्देमालासह आश्वी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत.


