
संगमनेर – प्रतिनिधी
शेंडेवाडी, साकूर आणि पिंपळगाव देपा येथील कारवाईत अटक करण्यात आलेले ॲट्रॉसिटी, बालमजूर कायदा आणि वेठबिगार कामगार कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुभाष राठोड आणि मधुकर दळवी यांना संगमनेर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी २५,००० रुपयांच्या जामिनावर त्यांना मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. हृषीकेश वाणी यांनी न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे मांडले. फिर्याद दाखल करण्यास तब्बल १० वर्षांचा उशीर झाला असून, फिर्यादीत नमूद केलेले गुन्हे आरोपींविरुद्ध लागू होत नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच, आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला नसून, त्यांना या प्रकरणात फसवण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

ॲड. हृषीकेश वाणी यांच्यासोबत ॲड. प्रशांत गुंजाळ यांनीही आरोपींची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, संगमनेरचे अतिरिक्त व सत्र न्यायाधीश शेख यांच्या न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे राठोड आणि दळवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर आणि कर्जुले पठार भागातील दगडखाणींवर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करत असलेल्या ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची प्रशासनाने यशस्वीरित्या सुटका केली होती.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना मिळालेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने आणि प्रभावीपणे ही कारवाई केली होती. मुक्त करण्यात आलेल्या ३८ वेठबिगार कामगारांमध्ये २२ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश असून या गंभीर प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर घारगाव पोलीस ठाण्यात वेठबिगार प्रतिबंधक कायद्यासह कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲट्रॉसिटी, बालमजूर आणि वेठबिगार कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यात मुख्य आरोपींना जामीन मंजूर, संगमनेर सत्र न्यायालयाचा निर्णय
दगडखाणींवर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करत असलेल्या ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची प्रशासनाने यशस्वीरित्या सुटका केली होती.

