
संगमनेर – प्रतिनिधी
राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्णत्वास गेलं आहे. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर, त्यांच्याच कार्यकाळात साकार झालेल्या निळवंडे धरणाचं पाणी कालव्यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील चिंचोलीगुरव गावात दाखल झालं आहे. यामुळे चिंचोलीच्या नागरिकांनी प्रचंड जल्लोष करत आनंद व्यक्त केला असून, थोरात यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण… तळेगाव पट्ट्यासह संपूर्ण दुष्काळी भागासाठी वरदान ठरलं आहे. या धरण आणि कालव्यांचं काम पूर्ण करणं हा थोरात यांच्या जीवनाचा ध्यास होता. त्यांनी केवळ धरणच नाही तर त्याचे कालवेही पूर्णत्वास नेले. गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी गावांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सत्तांतरानंतरही थोरात यांनी या भागातील जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी कटिबद्धता दाखवली.

या संदर्भातील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने या पाणी वाटप प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कारखान्याने आपली यंत्रणा आणि पाईप्स देऊन विविध गावांना पाणी पोहोचवण्यासाठी मोठ्या चाऱ्या (कॅनल्स) तयार केल्या. यासाठी कारखान्याची यंत्रणा, कर्मचारी, जेसीबी आणि पोकलँड रात्रंदिवस कार्यरत होते. चारी खोदून पाईप टाकण्याचे काम अविरत सुरू होतं. याच कामामुळे गेल्या वर्षापासून देवकौठे, मलढोण आणि सायाळे या गावांना पाणी मिळत आहे. इतर गावांनीही मागणी केल्यानंतर कारखान्याने त्यांनाही मोठी मदत केली.
चिंचोली गुरवमध्ये पाण्याचे थाटामाटात स्वागत… कालव्यापासून चिंचोली गुरव नदीपर्यंत तब्बल चार किलोमीटर अंतराची एक मोठी चारी खोदण्यात आली. या मार्गावर दोन बंधारे आणि तीन नद्या ओलांडून अखेर हे पाणी चिंचोली गावात पोहोचले. अनेक वर्षांपासूनचं स्वप्न साकार झाल्याने संपूर्ण नागरिकांनी मोठ्या उत्साहात पाण्याचे स्वागत करत जल्लोष साजरा केला.
यावेळी बोलताना संपतराव गोडगे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. ते म्हणाले की, धरण आणि कालवे थोरात साहेबांनीच पूर्ण केले. ज्यांची आता सत्ता आहे, त्यांचे या कामांमध्ये कोणतेही योगदान नाही. नवीन लोकप्रतिनिधींना तर कालवे आणि गावेसुद्धा माहीत नाहीत. थोरात हे सर्वांना पाणी देण्यासाठी कटिबद्ध असून, त्यांनी गेल्या वर्षी मध्यप्रदेशात कारखान्याच्या यंत्रणेसह जाऊन पाणी वरच्या भागाला देण्याचा पॅटर्न येथे राबवण्याचे निश्चित केले आहे. सरपंच विलास सोनवणे यांनीही अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाणी आल्याने मोठे समाधान व्यक्त केले.
गावातील ग्रामस्थ आणि कारखान्याच्या यंत्रणेने पाणी आणण्यासाठी मोठी मदत केली असून, चिंचोलीतील नागरिकांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.


