

सत्ता असली म्हणजे आपण काहीही करायला मोकळं, अशी स्वत:ची समज करून घेणार्या भाजपच्या नेत्यांना मनाची तर नाहीच, पण आता जनाचीही काही वाटत नाही, असंच दिसू लागलंय. आपल्याच मुख्यमंत्र्याच्या पत्नीला कधी देवरच्याही सोबत चला, असं सांगणारा माणूस एका राज्याचा मंत्री बनू शकतो, इतकी तर्हेवाईक स्थिती देशात प्रथमच निर्माण झाली आहे. देवर बनू पाहणार्या या माणसाच्या लाथ हाणून त्याला शिवराजसिंह चौहाण यांनी आपल्या मंत्रिमंडळातून दूर केलं. पण चार महिन्यातच हा माणूस पुन्हा चौहाण यांच्या मंत्रिमंडळात दाखल झाला. यावरून त्याचे दिल्लीपर्यंत पोहोचलेले हात काय ते सांगून जातात. एकदा आदिवासी विद्यार्थीनींच्या वसतीगृहाला भेट देताना या माणसाने विद्यार्थीनीच्या टीशर्टवर फाजील वक्तव्यं केलं होतं. तेव्हाही मध्यप्रदेशात टीकेचे बाण सुटले होते. पण तरीही त्याचं काही बिघडलं नाही. असं वाह्यात बडबडणार्या नेत्याला काँग्रेसच्या सत्ताकाळात घरचा रस्ता दाखवला जायचा. भाजपच्या सत्तेत अशा उपटसुंभ्यांची चलती आहे. असं कोणी बडबडेल त्याचं प्रमोशन करण्याची अनोखी पध्दत या सत्तेने अवलंबली आहे. यामुळेच देवरचा हात मागणारा विकृत मंत्री विजय शहा सत्तेत मंत्री म्हणून मिरवत आहे. आपलं कोणी वाकडं करणार नाही, अशा खात्रीनेच ही माणसं पुढे कसंही वागतात. वायू दलातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर त्या मुस्लिम आहेत म्हणून दुगाण्या झाडणार्या या नालायक मंत्र्याच्या विरोधात मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयाने गुन्हा नोदवण्याचा आदेश दिला नसता तर नवलच. सारे आपल्या खिशात असल्याच्या अविर्भावात वर्तन करणार्या मंत्र्याला खरं तर घरातून उचलून तुरुंगात टाकायला हवं होतं. पण आजही आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे, यामुळेच हा शहा बाहेर राहून स्वत:चा बचाव करत आहे. न्यायाचे दरवाजे कायद्याच्या राज्याप्रमाणे उघडत आहेत, असं मानून स्वत:चं समाधान करण्यावाचून आपल्याकडे पर्याय नाही. सार्या यंत्रणा सत्तेच्या बटिक झाल्यावर कायद्याच्या राज्यात न्याय मिळेल, अशा आशेवर राहणं इतकंच आपल्या हाती आहे. एकीकडे पाकिस्तानला शहाणपणाचे धडे गिरवण्याचा संदेश दिला म्हणून राज्यशास्त्राच्या विभागप्रमुख असलेल्या प्राध्यापकाला तो मुस्लिम असल्याने एका रात्रीत अटक होऊ शकते, पण आपल्याच संरक्षण दलातील जाँबाज महिला अधिकार्याविरोधात घृणास्पद वक्तव्यं करणारा नालायक मंत्री बाहेर मजा मारतो, हेच आपल्या लोकशाहीचं दुर्देवं होय.




ज्या इंदूरच्या महू जिल्ह्यात रायकुंडा इथे हा मंत्री बडबडला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी मंत्र्याच्या शेरेबाजीवर टाळ्या वाजवल्या, हे तर अगदीच भयानक म्हटलं पाहिजे. कोण्या एकाने जाब विचारण्याची हिंमत केली असती तर मंत्र्याला तिथेच माफी मागायला लागली असती. त्याऐवजी ताटाखालची मांजरं झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्याच्या असल्या वक्तव्याला दाद देत आपणही मंत्र्यासारखे नालायक आहोत, हे दाखवून दिलं. खरं तर मंत्री आणि त्याला ऐकणार्यांविरोधी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. जो मंत्री सोफिया कुरेशींविरोधात त्या मुस्लिम आहेत म्हणून दहशतवाद्याची बहीण ठरवण्याचा गुन्हा करतो त्या मंत्र्याविरोधी कारवाई करण्याची तयारी भाजप दाखवत नाही आणि एकही भाजपवाला त्या मंत्र्याविरोधात साधी प्रतिक्रियाही देत नाही, हे तर भयानक आहे. भाजपच्या या मंत्र्याऐवजी इतर कोण्या विरोधी पक्षाच्या नेत्याने असं वर्तन केलं असतं तर भाजपने त्याला सळो की पळो करून सोडलं असतं. त्याचे पुतळे रस्तोरस्ती पेटले असते. एकीकडे सारा देश सशस्त्र दलाच्या अधिकारी आणि सैनिकांचं कौतुक करत असताना मुस्लिम असलेल्या अधिकार्यावर शिंतोडे उडवतो म्हटल्यावर या मंत्र्याला पक्षाने लागलीच घरी बसवायला हवं होतं. त्याऐवजी अशा मंत्र्याला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करतात तेव्हा मंत्र्याचा आब वाढतो आणि तो देवरचा हात पकडता पकडता संरक्षण दलातील महिला अधिकार्यांना दहशतवादी ठरवतो.
देशातल्या सत्तेच्या मनात मुस्लिमांविषयी असलेली अडी लपून राहिलेली नाही. पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल या नौदलातील लेफ्टनंटंना जिवे मारणार्या दहशतवाद्यांची शिक्षा कश्मीर आणि देशातील मुस्लिमांना नको, ते ही आपले बांधव आहेत, असं सांगणार्या नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांना सत्तेच्या बटीकांनी केलेलं ट्रोल पाहिलं की या मंडळींच्या मनात मुस्लिमांविषयी किती घृणा आहे ते लक्षात येतं. सारा देश आणि जगातील असंख्य नागरीक हिमांशी यांच्या वक्तव्याचं समर्थन करत असताना ही पिलावळ हिमांशी यांना देशद्रोही ठरवत होती.