अहिल्यानगर, २६ मे:
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आषाढी वारीच्या दिंडी सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यासाठी प्रशासन आणि वारकरी यांच्यात समन्वयाची ग्वाही दिली आहे. त्यांनी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, ह.भ.प. अशोक सावंत आदी उपस्थित होते.
मंत्री विखे यांनी सांगितले की, जिल्ह्यातून २६० दिंड्या करमाळा मार्गे सोलापूर जिल्ह्यात जातात. संत निवृत्तीनाथ पालखी मार्गावरील निर्हेण ते शेगुड पर्यंतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि साईड पट्ट्या दुरुस्त कराव्यात. दिंडी मार्गावरील पारेगाव येथे मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच, संपूर्ण पालखी मार्गावर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. दिंड्यांच्या नोंदणीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयात शिबिर आयोजित केले जाईल.

यावर्षी पालखीच्या सुरुवातीलाच पाऊस होत असल्याने, वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यापुढे पावसाचे अंदाज वर्तवणारी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातून जाणाऱ्या २६० दिंड्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक दिंडीत पुरेशी औषधे उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
ज्या गावात किंवा शहरांमध्ये दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत, तेथील शाळा, महाविद्यालये आणि मंगल कार्यालयांमध्ये वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था केली जाईल. तिथे शुद्ध पिण्याचे पाणी, अखंडित वीज, आरोग्य सुविधा आणि शौचालयांची व्यवस्थाही केली जाईल. मागील वर्षीच्या दिंडीतील वारकऱ्यांच्या अडचणी यावर्षी दूर केल्या जातील आणि त्यांच्या सूचनांची दखल घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
वारकरी पायी चालत असलेल्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच, त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दिंड्यांसोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिंड्या मुक्कामी राहतील तेथेही पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील, असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पालखी मार्गावर आवश्यक साधनांसह तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारण्यात येतील. श्रीक्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर देवस्थानाचा ७०० कोटींचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये अनुदान आणि प्रत्येक वारकऱ्यास पाच लाख रुपयांचा विमा देण्यास शासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेकदा मुक्कामाच्या ठिकाणी अशुद्ध पाणी प्यायल्याने वारकरी आजारी पडतात. त्यामुळे प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्या दिंड्यांकडे स्वतःचे पाणी टँकर आहेत, त्यांच्या टँकरमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. दिंडीमध्ये अस्वच्छता होऊ नये यासाठी ‘हरित वारी – निर्मल वारी’ उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार शिवाजीराव कर्डीले, आ. विठ्ठलराव लंघे आणि आ. अमोल खताळ यांनीही वारीच्या नियोजनासंदर्भात सूचना केल्या. या बैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते, तसेच जिल्ह्यातील ७६ दिंडीचे प्रमुख आणि वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

