संगमनेर, प्रतिनिधी
संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील नवीन पुलाचे उर्वरित अपूर्ण काम १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदारास दिले आहेत. हा पूल स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर दरम्यान असून, आमदार खताळ यांनी गुरुवारी सकाळी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह या कामाची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे नेते श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर कर्पे, कैलास वाकचौरे, शिरीष मुळे, कैलास लोणारी, अविनाश थोरात, दगाबाई धात्रक, अल्पना तांबे, शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआय (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कासार, सागर भोईर, प्रशांत वाडेकर, निलेश कोंतम, लखन घोरपडे, विकास डमाळे, दिलीप अनाप, राहुल भोईर, शशांक नामन, सौरभ देशमुख, वरद बागुल, आश्विन परदेशी, सनी धारणकर, कृष्णा हासे तसेच साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आमदार खताळ यांनी सांगितले की, जुना पूल कोसळल्याने अनेक वर्षे नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झाले असून, आता ते अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत उर्वरित काम पूर्ण होऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि ठेकेदाराचे कौतुक केले.

या पुलामुळे दिगंबर गणेश सराफ विद्यालय आणि ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. १६ जूनपासून शाळा सुरू होत असून, नवीन पुलावरून शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात येईल, असे खताळ म्हणाले.



