
मुंबई – प्रतिनिधी
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोळ समोर आला आहे. तब्बल २ हजार ६५२ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेच्या निकषांचे उल्लंघन करत आर्थिक लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. या महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आले असून, त्यांच्यावर सरकारकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या पडताळणी मोहिमेदरम्यान हा गैरप्रकार समोर आला. माहिती व तंत्रज्ञान विभागाने सामान्य प्रशासन विभागाला १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिल्यावर पोर्टलवरील नोंदी तपासण्यात आल्या. या तपासणीत, सरकारी कर्मचारी असूनही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या २,६५२ महिलांची नावे समोर आली. योजनेच्या नियमांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

या प्रकरणावर बोलताना, गिरीष महाजन यांनी सांगितले की, “याची तपासणी सुरू आहे. काही सरकारी कर्मचारी असतील, काही आयकर भरणारे असतील, त्यांची नावे त्यात आली आहेत. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा फायदा घेतला आहे, त्यांना आता फायदा मिळणार नाही आणि त्यांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.”
दरम्यान, ‘नमो शेतकरी’ आणि ‘लाडकी बहीण’ या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या ८ लाख ८५ हजार महिलांच्या अर्जांचीही पडताळणी करण्यात आली आहे. या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आता केवळ ५०० रुपये प्रति महिना मिळणार आहेत, कारण त्या ‘नमो शेतकरी’ योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये घेत आहेत. येत्या काळात, सुमारे ६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचीही अशीच सखोल तपासणी केली जाणार असल्याचे समजते.


