विशेष प्रतिनिधी / मुंबई
युती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) जमीनदोस्त करण्याचे विधान केल्यापासून राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. महाजनांच्या या विधानाला प्रत्युत्तर देत खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागले. ज्यानंतर महाजनांनकडूनही उत्तर देण्यात आले. पण आता मात्र, खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले असून त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वाधिक भ्रष्ट मंत्री आहेत. महाजनांच्या कार्यालयात बसणारा अभिषेक कौल हा एक दलाल असून तो बिल्डर आहे. त्याने सांगितल्याशिवाय महाजन फाइल्सवर सही सुद्धा करत नाही, असा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता. 4 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. भाजपा आणि शिंदे गटाच्या लोकांचा दुसऱ्यांचे पक्ष फोडणं हा एकच अजेंडा आहे. ते आपापल्या मंत्रालयातली कामे करत आहेत का? माझ्या माहितीप्रमाणे गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय आहे. मोठी मिन्नतवारी करून त्यांना मंत्रालयात घेतलं आहे अशी माहिती माझ्याकडे आहे. त्यांना मंत्रिपदावर घ्यायला केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण यांच्यावर भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणं आहेत.
महाजन यांच्या मंत्रालयात अभिषेक कौल नावाचा कोण व्यक्ती आहे? हा एक ठेकेदार आणि बिल्डर आहे, तो महाजन यांच्या कार्यालयात बसतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन आपत्ती व्यवस्थापनाची एकही फाईल मंजूर करत नाही. कौलकडे सर्व पैसे जमा होतात. आपत्ती व्यवस्थापन हे खातं सर्वसामान्यांशी संबंधित खातं आहे. पण या विभागाच्या कार्यालयात 350 फईल पडून आहेत. कारण त्यांचे व्यवहार बाकी आहेत. गिरीश महाजन यांनी अभिषेक कौल हा ठेकेदार आणि बिल्डर नेमलेला आहे, हा कौल सगळे व्यवहार करतो, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.

फडणवीसांनी याचे पुरावे मागावे, ते मी द्यायला तयार आहे. पण तुम्ही कारवाई करणार नाही हे मला माहीत आहे. पण संपूर्ण राज्याला कळालं पाहिजे की फडणवीसांनी काय लायकीचे मंत्री मंत्रिमंडळात ठेवले आहेत. फडणवीसांनी जे साधू संतांचे महामंडळ जमा केलं आहे, त्यातले एक साधु हे गिरीश महाजन आहेत. काल कुंभमेळानिमित्त जी बैठक झाली आणि ते साधु संतांचे चरण स्पर्श करत होते त्यांनी गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल पटेल या ईडी पीडित साधू संतांच्या पाया पडायला हवे. या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला.
गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वाधिक भ्रष्ट मंत्री आहेत. अभिषेक कौल या व्यक्तीच्या मंजुरीशिवाय किंवा त्याने एखाद्या फाइलचा व्यवहार पूर्ण होत नाही. जिथे सामान्य लोकांच्या आयुष्याचा प्रश्न येतो, तिथे महाजन मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाइल मंजूर करतात. अशा व्यक्तीने पक्ष फोडीचा विचार करावा यात सगळे आले, असेही यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस हे अशा गोष्टींबद्दल खोटं बोलतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. अंदाज समितीच्या पीएनेच भ्रष्टाचार केला होता. या प्रकरणी आम्ही आणलेल्या दबावामुळे गुन्हा दाखल करावा लागला. अंदाज समितीच्या चेअरमनच्या पीएकडे 15 कोटी रुपयांचा नजराणा शासकीय वास्तूत जमा झाला, फडणवीस तुम्ही कुणाशी खोटे बोलत आहात? या मंत्रालयातील फाइल वजन ठेवल्याशिवाय हलत नाही. गिरीश महाजनांच्या 350 फाइल्सचे पुरावे आम्ही देऊ, हे पुरावे आम्ही किरीट सोमय्यांकडे सुद्धा देऊ. पण ते आहेत कुठे विचारा? असा टोला राऊतांनी लगावला.


