
संगमनेर (प्रतिनिधी):
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे निळवंडे धरणाचे डावे आणि उजवे कालवे त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाले असून, या कालव्यांमधून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी पोहोचले आहे. यामुळे अनेक बंधारे आणि गावतळी भरली असून, तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाल्याचे संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी म्हटले आहे.
बुधवारी (४ जून) रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते अंभोरे, पानोडी, मालुंजे, पिंपारणे येथील उजव्या कालव्यातून भरलेल्या बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. यावेळी संचालक सतीश वर्पे, गंगाराम वाकचौरे, अण्णा राहिंज, लहानभाऊ वर्पे, रवींद्र रोहम, अरुणराव देशमुख, शुभम काळे, दिनकर वाकचौरे, नवनीत देशमुख, राजेंद्र देशमुख, सरपंच नारायण मरभळ, अरुण राहिंज, रमेश राहिंज, बाबासाहेब राहिंज, संजय राहिंज, कृष्णा रकटे, भिमाजी राहिंज यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उजव्या कालव्यालगतच्या गावांना पाणी मिळावे याकरिता सुमारे २ कोटी रुपयांच्या पाईपलाईनची सोय करण्यात आली आहे. यामुळे या गावांमधील बंधारे पाण्याने भरण्यात आली असून, या जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख यांनी, विभागाच्या विकासासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले. डावा आणि उजवा कालवा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आमदारकी आणि मंत्रिपद पणाला लावले. त्यांच्या कठोर परिश्रमातून हे ऐतिहासिक काम पूर्ण झाले आहे.
त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे आज दोन्हीही कालव्यांमधून पाणी वाहत आहे, यामुळे या भागातील बंधारे पाण्याने भरली आहेत. याचा शेतीसाठी मोठा उपयोग होणार असून, पाण्यामुळे जलसमृद्धी निर्माण झाली आहे. माजी मंत्री थोरात यांच्या प्रयत्नांमुळे दुष्काळी तालुक्याचे रूपांतर आता प्रगतशील तालुक्यात झाले आहे. कृषी, दुग्ध, शिक्षण, सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये संगमनेर तालुका राज्याला दिशादर्शक ठरत आहे.
अण्णासाहेब राहिंज यांनी यावेळी बोलताना, ज्या लोकांनी धरणाला विरोध केला, त्यांची आज सत्ता आहे. त्यांचे कालवे आणि धरणामध्ये कोणतेही योगदान नाही. निळवंडेचे पाणी तालुक्यातील प्रत्येक गावात येणे हा तालुक्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असे सांगितले.
याप्रसंगी गावोगावी मोठ्या उत्साहात जलपूजन करण्यात आले. गावातील युवकांनी मिरवणुका काढून आणि आनंदोत्सव साजरा करून आपला उत्साह व्यक्त केला. निळवंडेच्या पाण्यामुळे संगमनेर तालुक्यात समृद्धीची नवी पहाट उगवली असून, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


